Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
8 जून 2025, 11:12 IST
“मला आजही तो दिवस आठवतो. मी आयकॉनिक मेहबूब स्टुडिओमध्ये गेलो होतो. दिग्दर्शक राज खोसला यांना भेटायला. स्पॉटबॉयने सांगितलं की, ते झोपले आहेत. दुपारची वेळ होती. ते नेहमी छोट्या छोट्या डुलक्या घ्यायचे. त्यांनी बोलावल्यावर आत गेलो.
“उकाड्याचे दिवस होते आणि त्यांची रुम खूप गार होती. एसी होता. त्यांनी मला विचारलं की, तुला सिनेमाबद्दल काय माहीत आहे (डू यू नो एनिथिंग अबाउट फिल्म्स?) मी म्हटलं की, नो सर. त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि म्हटलं की, व्हेरी गुड. झिरो इज द ग्रेट फिगर टू बिगिन फ्रॉम.”
या भेटीपासून महेश भट्ट या 19 वर्षाच्या तरुणाचा दिग्दर्शक महेश भट्ट बनण्याचा प्रवास सुरू झाला.
नवीन पिढीला महेश भट्ट यांची ओळख राज, मर्डर, जिस्मसारख्या बोल्ड सिनेमांमुळे आहे. 90 च्या दशकातील मुलांना आशिकी, सडक, दिल है के मानता नहीं यांसारख्या लव्हस्टोरी आणि त्यातल्या सुमधूर गाण्यांमुळे आहे. तर त्याआधीच्या एका पिढीला महेश भट्ट माहीत आहेत- अर्थ, सारांशसारख्या सिनेमांमुळे.
स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचं प्रतिबिंब असलेल्या, त्यातल्या वेदनेला जिवंत करणाऱ्या सिनेमांपासून सुरू झालेला प्रवास तद्दन व्यावसायिक सिनेमांपर्यंत कसा आला? आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना महेश भट्ट यांच्या भावना नेमक्या काय आहेत? सिनेमातून तुकड्यातुकड्यांत त्यांनी मांडलेलं स्वतःचं आयुष्य आणि वास्तव कसं आहे? याच प्रश्नांची उत्तर स्वतः महेश भट्ट यांनीच इरफान यांच्याशी बीबीसी हिंदीच्या ‘कहानी जिंदगी की’ या कार्यक्रमात संवाद साधताना दिली.
शिया मुस्लिम आई आणि ब्राह्मण वडील
महेश भट्ट यांचा जन्म 20 सप्टेंबर 1948 रोजी झाला. त्यांची आई शिया मुस्लिम तर वडील ब्राह्मण होते.
“माझी आई नेहमी म्हणायची की, तू नागर ब्राह्मणाचा मुलगा, भार्गव गोत्र, अश्विन शाखा आहे.”
महेश भट्ट यांच्या आईचा त्यांच्या वडिलांशी विवाह झाला नव्हता.
“वडिलांनी आमच्या आईशी लग्न केलं नव्हतं. हे एक असं सत्य होतं जे आम्ही लपवायचो.”
महेश भट्ट यांचं कुटुंब, त्यांच्या आई-वडिलांचे संबंध हे सर्वसामान्यांप्रमाणे नव्हते. कारण त्या दोघांमध्ये पती-पत्नीचं वैवाहिक ते नातं नव्हतं. त्यामुळेच इतर मुलांच्या आई-वडिलांप्रमाणे आपले आई-वडील नाहीयेत हा न्यूनगंड लहानपणी त्यांच्या मनात होता.

फोटो स्रोत, Getty Images
“आम्हाला लोक कधी घरी बोलवायचे नाहीत. पण जेव्हा कधी कोणाकडे जायचो, तेव्हा त्यांच्या घरात फोटो असायचे. त्या घरांमध्ये घरात जसे कुटुंबाचे फोटो असतात, तसे आमच्या घरात नसायचे. तेव्हा वाटायचं की, घर असं असतं तर. थोडसं विचित्रही वाटायचं.”
वैयक्तिक आयुष्यातल्या या दुःखापासून लांब जाण्यासाठीच कदाचित त्यांनी एकांत आणि तत्वज्ञानाचा आधार घेतला. त्यांचं घर शिवाजी पार्कजवळ होतं. तिथून ते दादर चौपाटीला समुद्र किनारी जाऊन बसायचे. तिथे बसून सूर्यास्त पाहताना एक वेगळीच भावना यायची, असं ते सांगतात.
“दादरलाच बेंगाल क्लब होता. दरवर्षी तिथं दुर्गा पूजा व्हायची. ती पाहताना मला वाटायचं की ही शक्ती माझ्या आईमध्ये यावी. ती आयुष्यभर सिंगल मदर बनून राहिली.”
आई हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती. आईबद्दलच्या त्यांच्या भावना ‘जख्म’ सिनेमातही दिसल्या होत्या.
कामाच्या शोधात
महेश भट्ट यांचं शिक्षण डॉन बॉस्कोमधून झालं. शालेय जीवनात ते फार हुशार विद्यार्थी नव्हते.
“मी बाहेर पळून जायचो, रस्त्यावरची दुनिया खुणावायची. जे काही शिकवायचे, ज्या नैतिकतेचे धडे द्यायचे ती मला प्रत्यक्ष आयुष्यात कधीच दिसायची नाही…ना शिक्षकांमध्ये, ना मोठ्या माणसांमध्ये.”
त्यामुळेच कदाचित आय़ुष्यात पुढे काय बनायचं हे ठरवून महेश भट्ट यांनी शिक्षण घेतलं नसावं. घरच्या परिस्थितीनेही त्यांना लवकरच कमावतं बनायला भाग पाडलं.
“वडिलांना दोन घरं चालवायची होती. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती. आईने तर सरळ सांगितलं होतं की, बेटा, पैसे कमावून आण नाहीतर घरी येऊ नको. एका वयानंतर आपल्यालाही असं वाटायला लागतंच की घरासाठी काहीतरी करायला हवं. पंधरा वर्षांचा असल्यापासून मी कमावायला लागलो.”
एअर फ्रेशनर विकण्यापासून मार्केट रिसर्च करण्यापर्यंत अनेक कामं महेश भट्ट यांनी केली.
राज खोसलांसोबतची भेट आणि फिल्म इंडस्ट्रीतला प्रवेश
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या सिनेमांचं आज आपल्याला कौतुक असलं तरी त्यांच्यासाठी सुरूवातीला हे माध्यम हे केवळ उपजीविकेचं एक साधन होतं. वयाच्या पंधराव्या वर्षापासून पडेल ती कामं करत घरी हातभार लावणाऱ्या महेश भट्ट यांची 19 व्या वर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक राज खोसला (सीआयडी, मेरा साया, वह कौन थी यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक) यांच्याशी भेट झाली आणि तिथून त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास सुरू झाला.
खरंतर सिनेमा बनवायचा, त्यासाठी शिक्षण घ्यायचं या हेतूने ते राज खोसलांना भेटले नव्हते. केवळ काम हवं हाच उद्देश होता.
त्या भेटीची आठवण आजही ताजी असल्याचं महेश भट्ट सांगतात.
“19 व्या वर्षी मेहबूब स्टुडिओत गेलो. दरबानाने अडवलं. माझ्या पायात बाटाची चप्पल होती झिजलेली, त्याचा बंद हातात यायचा, तो लावावा लागायचा. त्याने विचारलं की, कुठे चाललाय. मी म्हटलं की, राज खोसला साहेबांना भेटायचं आहे. त्यांनी बोलावलंय.
त्याने विचारलं- बोलावलंय?
मी म्हटलं की, हो बोलावलंय म्हणून आलोय.
मी ज्या आत्मविश्वासाने हे सांगितलं ते ऐकून त्याला वाटलं की, खरंच बोलावलं असेल. काही बोलावलं वगैरे नव्हतं…माझ्या एका चुलत बहिणीने सांगितलं होतं की, जाऊन पाहा काही होत असेल तर”

फोटो स्रोत, Getty Images
राज खोसला यांच्या भेटीत काय झालं याचा उल्लेख लेखाच्या सुरूवातीलाच केला आहे.
राज खोसला ‘दो रास्ते’ नावाचा सिनेमा बनवत होते. महेश भट्ट यांनी त्यासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर ‘मेरा गाव, मेरा देश’ सिनेमासाठीही काम केलं.
“या दोन चित्रपटांनंतर मी स्वतंत्रपणे माझा प्रवास सुरू केला. माझे सलग चार चित्रपट चालले नाहीत. मंझीले और भी है, नया दौर (ज्यामध्ये ऋषी कपूर नायक होते) सिनेमा केला. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. माझ्या पहिल्या सिनेमानंतर, ‘मंझीले और भी है’नंतर त्यांनी मला गुलाबांचा एक गुच्छ पाठवला होता. माझ्या आय़ुष्यातला तो पहिला गुलाबांचा गुच्छ होता. विनोद खन्ना सोबत माझी मैत्री होती. त्याच्यामुळे ‘लहू के दो रंग’ हा सिनेमा मिळाला. तो ठीक चालला.”
परवीन बाबीसोबतचं प्रेमप्रकरण
एका बाजूला वयाच्या विशीतच फिल्म इंडस्ट्रीतला महेश भट्ट यांचा प्रवास सुरू झाला होता तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार येत होते. वयाच्या 21 व्या वर्षी महेश भट्ट यांनी विवाह केला होता आणि वयाच्या 23 व्या वर्षी त्यांच्या मुलीचा, पूजाचा जन्म झाला होता. याच काळात त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री परवीन बाबी आल्या होत्या.
परवीनसोबतचे संबंध माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता, असं ते म्हणतात.
“पूजाच्या आईसोबत माझे संबंध अगदी वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपासून म्हणजे आम्ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये होतो तेव्हापासून होते. आशिकीमध्ये तुम्हाला तिची झलक पाहायला मिळेल. तेव्हा माझ्या नैतिकतेच्या कल्पना लग्न, एकनिष्ठता, मुलं अशा होत्या. आणि त्यालाच परवीन प्रकरणाने धक्का बसला. तू तुझ्या वडिलांपेक्षा वेगळा कसा हा प्रश्न मी स्वतःच स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून विचारला.”
परवीन बाबी यांना मानसिक आजार होता. मात्र, सुरुवातीला आपल्याला याबद्दल कसलीच कल्पना नव्हती, असं महेश भट्ट यांचं म्हणणं होतं.
“एखाद्याला डोळ्यांसमोर आतून तुटताना, मोडताना पाहणं कठीण असतं. सकाळी ती मेकअप करून शूटिंगला जायची, संध्याकाळी पाहिलं तर घराच्या एका कोपऱ्यात थरथर कापत बसलेली असायची. तिला स्क्रिझोफ्रेनिया होता. यातून तिला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. ते नातं एका वेदनादायी वळणावर येऊन संपलं.”

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्याच्या या कठीण टप्प्यावर महेश भट्ट यांना मदत झाली ती तत्वचिंतक यूजी कृष्णमूर्ती यांची. परवीन बाबी यांच्यासोबतचं नातंही फार पुढे जाणार नाही, याची कल्पना यूजींनीच महेश भट्ट यांना दिली होती.
“त्यांनी मला म्हटलं की, तुम्ही दोघं सोबत राहू शकत नाही. कारण तू फिल्म इंडस्ट्री सोडणार नाहीस आणि ती तिथे राहिली तर उद्ध्वस्त होईल.”
परवीन बाबी यांनी महेश भट्ट यांना यूजी कृष्णमूर्ती किंवा त्यांच्यामध्ये एकाचीच निवड करण्याचा पर्याय दिला.
“मी पाहात राहिलो. मला कळत होतं की, ती आत्महत्येच्या दिशेने जात आहे. आणि मी आयुष्यात एकदा जे पाहिलं आहे, तेच पुन्हा भोगण्याची शक्ती माझ्यात नव्हती. त्यामुळे मी या नात्यातून बाहेर पडलो.”
परवीनसोबतचं त्यांचं नातं वेदनादायी वळणावर येऊन संपलं. त्यातच या नात्यामुळे आपण आपल्या पत्नीलाही न्याय देऊ शकलो नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. हाच सल मोठ्या पडद्यावर सिनेमाच्या रुपाने व्यक्त झाला…अर्थ हा सिनेमा बनला.
तो माझा पुनर्जन्म होता, असं महेश भट्ट म्हणतात.
‘अर्थ’ सिनेमाची गोष्ट
त्याकाळी ज्या धाटणीचे सिनेमे येत होते, अर्थ हा त्याच्याशी पूर्णपणे फारकत घेणारा सिनेमा होता. आपल्या प्रेयसीला सोडून बायकोकडे परत आलेल्या नवऱ्याला न स्वीकारणारी, मी तुझ्या जागी असते तर मला माफ केलं असतंस का असं म्हणणारी, आपल्या मित्रालाही नकार देत आयुष्य जगण्यासाठी मी एकटीच पुरेशी आहे म्हणणारी नायिका.
या विषयाला हात घालण्यासाठी प्रोड्युसर तयार नव्हते.
“मला एक कमाल प्रोड्यूसर भेटला होता. मनजित पाल. त्यांची आणि माझी भेटही वेगळ्याच कारणाने झाली होती. माझ्या वडिलांना ग्लुकोमा होता. त्यांना कमी दिसायला लागलं होतं. ते एक फिल्म बनवत होते, त्याचे दोन-तीन रिल्सच बनले होते. मनजित पाल माझ्याकडे आला आणि म्हणाला, की हा राहिलेला सिनेमा तुम्ही पूर्ण करा. मी म्हटलं कसं शक्य आहे. त्यावर तो म्हणाला की, माझा सगळा पैसा आता बुडेल. मी विचारलं की, किती पैसे आहेत. त्याने काहीतरी चौदा-पंधरा लाखांचा आकडा सांगितला. मी म्हटलं की, मग माझ्याकडे एक गोष्ट आहे. शबाना, स्मिता पाटील यांना घेऊन मी एक सिनेमा बनवत आहे. त्याला मी गोष्ट सांगितली. त्याला वाटलं की, हे काहीतरी चांगलं आहे आणि ‘अर्थ’ बनला.”

फोटो स्रोत, Anu arts
सिनेमा बनला, पण त्याचा जो क्लायमॅक्स होता तो पाहून सगळे म्हणायचे की हे कसं चालेल. निर्माताही क्लायमॅक्स बदलूया का म्हणू लागला. पण महेश भट्ट यांनी म्हटलं की, ‘नाही. हे लोक कमनशिबी आहेत. त्यांना हे कळत नाहीये.’
शेवटी मुंबई-दिल्लीत वितरक मिळाले. सिनेमाची चर्चा सुरू झाली आणि तो चाललाही. या सिनेमासाठी शबाना आझमींना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
इथेच मला माझ्या सिनेमासाठी ‘ऑटोबायग्राफिकल इडियम’ (वैयक्तिक आयुष्यावर बेतलेले सिनेमे) मिळाला, असं महेश भट्ट सांगतात.
“लोक म्हणतात की बाजारात काय चालेल ते बनवा. पण तुम्ही जे थेट अनुभवलं आहे ते सांगा लोकांना. हा जो अनुभव असतो, त्यातली वेदना, त्यातला गोडवा, त्यातली सल लोकांपर्यंत अधिक तीव्रतेने पोहोचते. अर्थच्या बाबतीत हेच झालं.”
आशयघन सिनेमा ते इरॉटिक
सारांश, जख्म, अर्थ, डॅडी, तमन्ना यांसारखे आशयघन सिनेमे देणाऱ्या महेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सने नंतर राज, मर्डर सीरीज, जिस्म, पाप, जहर यांसारखे सिनेमे बनवले. सुमधूर संगीत आणि बोल्ड दृश्य हीच विशेष फिल्मची ओळख बनली. अगदी सेमी पॉर्न अशीही टीका या सिनेमांवर झाली.
ज्या सिनेमांसाठी आपल्याला कायम लक्षात ठेवलं जावं, असे मोजके सिनेमे करून थांबणं महेश भट्ट यांना शक्य नव्हतं का? नंतर त्यांनी ज्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती केली, ती त्यांना स्वतःची अधोगती वाटते का?
आपल्या या सगळ्या निर्णयांबद्दल महेश भट्ट खूप सविस्तर बोलले.
“मी वयाच्या 21 व्या वर्षी जेव्हा सुरूवात केली तेव्हा मी स्वतःला कधीही फिल्ममेकर म्हटलं नाही. मी केवळ कमाईचं साधन म्हणून सिनेमा बनवायला सुरूवात केली. सुरुवातीचे चार सिनेमे चालले नाहीत. मग अर्थ, सारांश चालले. त्यानंतर आलेला नाम ब्लॉकब्लस्टर होता.
8० चं दशक संपता संपता संपता भारत बदलू लागला होता. व्हीसीआर येऊ लागले होते. मिडल क्लास प्रेक्षक थिएटरमध्ये जात नव्हता. टेलिव्हिजन सुरू झाला होता. अर्थ, सारांशसारख्या सिनेमांचा जो प्रेक्षक होता, तो थिएटरमध्ये जात नव्हता.”

फोटो स्रोत, Getty Images
या सगळ्याचा परिणाम ज्यापद्धतीचा सिनेमा बनत होता, त्यावरही दिसत होता. महेश भट्ट यांनी या काळात आशिकी, हम है राही प्यार के, दिल है की मानता नहीं सारखे म्युझिकल, रोमँटिक चित्रपट केले. हे सगळे हिट होते.
“पण नंतर पुन्हा मला वाटलं की, हेच करत राहायचं का. एकसुरीपणा यायला लागला. 90 च्या मध्यापासून माझा घसरणीचा काळ सुरू झाला. त्याकाळी शाहरुखला घेऊन फ्लॉप सिनेमा करणारा मी एकमेव दिग्दर्शक असेन. याचं कारण हे केवळ मी काळानुरुप सिनेमा बनवण्यात अपयशी ठरलो होतो, हेच होतं.”
दरम्यान, हा तोच काळ होता जेव्हा देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. बाबरीचं पडणं, मुंबई दंगल यांमुळे हिंदू-मुस्लिम तणाव वाढला होता.
“92-93 च्या काळातील जे राजकीय वातावरण होतं. त्याचाही मला धसका बसला होता. कारण लहानपणापासून आम्ही हेच समजत मोठे झालो होतो की, आम्ही नागर ब्राह्मण वडिलांची मुलं आहोत आणि आई शिया मुस्लिम आहे. त्यातून जी शिकवण आम्हाला मिळाली होती, तिचेच तुकडे होत होते. त्याचा तो ट्रॉमा होता.
त्यावेळी मनात विचार आला की, दिग्दर्शक म्हणून थांबण्याच्या आधी एक सिनेमा असा बनवूया जो विषय मनाच्या खूप जवळचा असेल. तो विषय होता माझं लहानपण. ‘जख्म’ बनवला. त्यासाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सिनेमा तेव्हा चालला नाही, पण नंतर तो क्लासिक म्हणून गणला जाऊ लागला.”
‘जख्म’ नंतर महेश भट्ट यांनी दिग्दर्शक म्हणून थांबायचं ठरवलं. नवीन फिल्ममेकर्स येत आहेत, आपण आउटडेटेड बनत आहोत असं त्यांना वाटायला लागलं होतं. त्यामुळेच त्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याचा, मेन्टॉरिंग करण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
“त्यावेळी स्टारकास्ट घेऊन सिनेमा बनविण्याचा प्रघात होता. आम्ही मात्र नॉन स्टार्स, लो कॉस्ट, हाय कन्सेप्ट फिल्म बनवायला सुरूवात केली. ज्याला काही लोकांनी ‘सेमी पॉर्न’ म्हणायला सुरू केलं. आम्ही त्याला ‘इरॉटिक’ म्हणत होतो. या सिनेमांवर टीका झाली, मात्र हे सगळे चित्रपट सेन्सॉर होऊन आले होते. आम्ही काही बॅकडोअरने रिलीज केले नव्हते. राज, मर्डर हिट झाले. आम्ही अनेक नवीन चेहरे आणले. इम्रान हाश्मीला इंट्रोड्यूस केलं. ती व्यवसायातील एक फेज होती. एवढंच मी म्हणेन.”
फिल्म इंडस्ट्रीमधली जवळपास 50 वर्षांची कारकीर्द, अनेक चढ-उतार, आजही आठवणीत राहतील असे चित्रपट केल्यानंतरही महेश भट्ट यांना आपलं सर्वांत क्रिएटिव्ह काम हे त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाटतं. त्यांचे गुरू, मार्गदर्शक असलेल्या यूजी कृष्णमूर्तींवर त्यांनी यूजी कृष्णमूर्ती अ लाइफ आणि ए टेस्ट ऑफ लाइफ : द लास्ट डे ऑफ यूजी कृष्णमूर्ती अशी पुस्तकं लिहिली आहेत.
आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना मग ते वैयक्तिक असो की व्यावसायिक कोणत्याही गोष्टीचा खेद, पश्चाताप वाटतो का याबद्दल बोलताना 76 वर्षांचे महेश भट्ट म्हणतात की, “नाही. मी पुन्हा तेच करेन जे मी आधी केलं होतं. मी माझं आयुष्य माझ्या टर्म्सवर जगलो आणि यापुढेही जगेन.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC