Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI/BBC
रविवारी, 15 जून 2025 रोजी पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच वर्षांचा चिमुकला विहान आणि त्याचे वडील रोहित माने यांचा समावेश आहे. या दुर्घटनेतून बचावलेली विहानची आई शमिका सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.
पुणे शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मावळ तालुक्यातील कुंडमळा हे ठिकाण निसर्गरम्य परिसरामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. पावसाळा सुरू झाला, की येथे पर्यटकांची गर्दी वाढते.
रविवारी 100 ते 150 पर्यटक वर्षाविहारासाठी जमले असताना इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल अचानक कोसळला. त्यामुळे सुमारे 55 पर्यटक नदीत पडले. त्यापैकी 51 जणांना वाचवण्यात आलं, पण चौघांचा मृत्यू झाला.
सुमारे 30 वर्षं जुना हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी होता आणि त्याची क्षमता एका वेळी डझनभर लोकांचीच होती. मात्र, पूल कोसळण्याआधी अनेक पर्यटक मध्यभागी जमून सेल्फी घेत होते.
त्याचवेळी दोन्ही बाजूंनी काही टू-व्हीलर वाहने पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पुलावर गर्दी झाली आणि काही लोक अडकल्यामुळे वाहतूक खोळंबली.

फोटो स्रोत, ANI
पूल कोसळण्याचे तात्काळ कारण पर्यटकांची गर्दी हे असले, तरी या जीर्ण पुलाकडे सरकारने वेळेवर लक्ष दिले असते, तर कदाचित 5 वर्षांच्या चिमुकल्या विहानसहित चार जीव वाचले असते, असं माने कुटुंबाचे शेजारी म्हणाले.
माने परिवार पिंपरी-चिंचवड येथे राहायचा.
दरम्यान, या घटनेची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं आहे.
जीर्ण झालेल्या पुलाचा धोका लक्षात घेऊन गेल्यावर्षी सरकारने नवीन पुलाची मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्ष काम सुरू का झाले नाही? या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण, हे आपण जाणून घेऊया.
पण त्याआधी, रविवारी दुपारी या पुलावर नेमके काय घडले, ते आधी समजून घेऊ.
‘काही सेकंदात पूल कोसळला, काहीच समजलं नाही’
पूल कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे 16 जून रोजी, या ठिकाणी भकास वातावरण होते. आदल्या दिवशी पर्यटकांची तुफान गर्दी असलेल्या ठिकाणी आता सुमसान शांतता होती.
NDRF चे जवान बचावकार्य पूर्ण करून निघून गेले होते.
बीबीसीने अपघातातून वाचलेले विजय यांच्याशी हॉस्पिटलमध्ये बातचित केली.
ते म्हणाले, “रविवारी सुटी असल्याने आम्ही सात मित्र कुंडमळा येथे गेलो होतो. पुलावर पोहोचलो तेव्हा तिथं अचानक गर्दी झाली, कारण दोन्ही बाजूंनी टू-व्हीलर वाहने आली. त्यामुळे जाम झाला आणि काही क्षणांत पूल कोसळला. आम्ही दणकन एका दगडावर आदळलो.”
विजय आणि त्यांचे आणखी तीन मित्र या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोराने आदळल्यामुळे विजय यांचा पाय मोडला आहे.

गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी अपघात घडत असल्याचं इंदोरी गावाचे सरपंच शशिकांत शिंदे सांगतात.
“पावसाळा सुरू झाला की कुंडमळा पुलावर गर्दी वाढू लागते. सुटीच्या दिवशी इथली परिस्थिती आवाक्याबाहेर जाते. त्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्तही मागितला होता. पण रविवारी काही अतिउत्साही पर्यटक पुलावर जाऊन सेल्फी फोटो काढू लागले. गर्दी वाढल्याने पूल अचानक हलू लागला आणि दुर्दैवी घटना घडली,” असं शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
अपघात झाल्यावर स्थानिकांनी लोकांना वाचवण्यासाठी ताबडतोब मदत केल्याचं जखमी सांगतात.
पण त्यासोबत वाचलेले काही पर्यटक हे जखमींना मदत करण्याऐवजी अपघाताचे व्हीडिओ काढण्यात मग्न होते, असंही काही व्हीडिओंतून दिसत आहे.
अतिउत्साही पर्यटक की सरकारी अनास्था, जबाबदार कोण?
दरम्यान, या दुर्घटनेवरून विरोधीपक्षनेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. पूल आधीच धोकादायक स्थितीत होता, तर तो पूर्णतः बंद का केला नाही, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
“धोकादायक पूल पाडून नवीन पूल का बांधला गेला नाही? फक्त बचावकार्य करणे, चौकशी समित्या नेमणे आणि अभ्यास करत राहणे, हे आपण नेमके कुठवर करत राहणार?” असा सवालही त्यांनी सरकारला केला.
याशिवाय संजय राऊत, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि इतर नेत्यांनीही सरकारवर टीका केलीय.
दरम्यान, या पुलाची अवस्था नाजूक झाल्याची माहिती इंदोरी गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती. तसेच, धोकादायक पुलावर गर्दी करू नये, यासाठी तिथे बोर्डही लावण्यात आल्या होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

सरपंच शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, ग्रामस्थांकडून नवीन पुलाच्या बांधकामासाठी वारंवार मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार जुलै 2024मध्ये राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पुढे याचं निविदा निघाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर निघणं अपेक्षित होतं.
ते मात्र गेल्या काही महिन्यांपासून तसं घडलं नाही.
कामाच्या मंजुरीनंतर विधानसभा निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागू झाली. याकाळात पुलाबाबतच्या तांत्रिक गोष्टी आणि पूलाचे डिझाईन पूर्ण करण्यात आले.

सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये आचारसंहिताही संपली. तरीही वर्क ऑर्डर निघाली नाही.
रविवारच्या दुर्घटनेनंतर मात्र पुलाचं काम सुरू करण्याबाबतची वर्क ऑर्डर काढल्याचं एका सरकारी पत्रकातून समोर आले आहे. यावरची तारीख आहे 10 जून 2025.
पण यावर सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीवर पूल बांधण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर पूल बांधायला निविदा काढणं हे कितपत योग्य आहे, असेही प्रश्न विचारले जात आहेत.
मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी काय म्हणाले?
सोमवारी (16 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 10 जून रोजी जरी काम सुरू झालं असतं, तरी इतक्या लवकर ते पूर्ण झालं नसतं.
फडणवीस पुढे म्हणाले, “पूल धोकादायक झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच नोटीस काढून माहिती दिली होती आणि ग्रामपंचायतीनेही तिथे धोक्याची पाटी लावली होती. त्यामुळे यात कुणा एकाची चूक आहे, असं म्हणता येणार नाही.”
कदाचित पूल इतका जीर्ण झालाय, हे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
“भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जातील. मान्सूनदरम्यान जीवाला धोका पोहोचवू शकणाऱ्या पुणे जिल्ह्यात जवळपास पाचशे ठिकाणं आहेत. तिथे यापुढे अधिक काळजी घेण्यात येईल,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असं सांगितलं आहे. पुलाच्या देखभालीत कोणतेही दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून त्यात पोलीस, जलसंपदा आणि वनखात्याचे अधिकारी असतील. या समितीचे दोन मुख्य उद्देश असतील :
- घटनेची सखोल चौकशी करून प्रशासनातील त्रुटी समोर आणून योग्य ती कारवाई करणे.
- मान्सूनमध्ये धोकादायक ठिकाणांसाठी असलेल्या प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) मध्ये आवश्यक बदल सुचवणे.
जर धोक्याच्या पाट्या आणि बॅरिकेड्स असूनही अपघात होत असतील, तर आणखी कोणते उपाय करता येतील, यावर समिती विचार करेल, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, प्रशासनाची चूक आढळल्यास कडक कारवाई केली जाईलच, पण पर्यटकांनी स्वतःचाही जीव धोक्यात टाकू नये, असंही डुडी यांनी आवाहन केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC