Source :- BBC INDIA NEWS

मृत विकी यांच्या आत्या

फोटो स्रोत, Shardul Kadam

“या गर्दीचं कोण काय करणार आहे. कोणी काही उपाय करत नाही. कितकच मरुदेत पण सरकार काही दखल घेत नाही,” अशा शब्दांत विकी मुख्यदल यांच्या आत्यांनी त्यांच्या भावना मांडल्या.

सोमवारी झालेल्या दुर्घटनेत विकी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

दररोज प्रवाशांनी भरगच्च धावणाऱ्या लोकल रेल्वेतून विविध कारणांनी अनेकांचा मृत्यू होतो किंवा प्रवासी गंभीर जखमी होत असतात.

मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतून दररोज जवळपास तब्बल 63 लाख प्रवासी प्रवास करतात. म्हणूनच की काय देशाची आर्थिक राजधानी मुंबईची ही लाईफलाईन मानली जाते.

पण हीच लाईफलाईन ‘डेथलाईन’ बनत चालली आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

सोमवारी (9 जून 2025) सकाळी साधारण 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस (सीएसएमटी) ते कर्जत आणि कसरा ते सीएसएमटी अशा दोन दिशांनी आलेल्या रेल्वे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ बाजूबाजूला आल्या.

तेव्हा धावत्या रेल्वेतून एकमेकांचा आणिबॅगांचा धक्का लागून 13 प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले.

काही रुग्णांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं, तर काहींना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात.

‘नेते येतात पण रेल्वेच्या गर्दीचा प्रश्न कोणीही सोडवत नाही’

अपघातात जखमी झालेले रेल्वे पोलीस कर्मचारी 34 वर्षीय विकी मुख्यदल यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचं कळताच विकी यांचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात पोहचले. त्यांच्या आत्या मालन वावळे तरुण भाच्याचा मृतदेह पाहताच धाय मोकलून रडू लागल्या.

विकी मुख्यदल मूळचे हे जालना जिल्ह्यातील एका खेडेगावातील. प्रचंड कष्ट करून त्यांनी रेल्वे पोलीस दलात नोकरी मिळवली. कल्याणमध्ये ते पत्नी आणि लहान मुलासह राहत होते.

प्रमिला जाधव, मृत पोलीस कर्मचारी विकी मुख्यदल यांच्या मावशी

फोटो स्रोत, Shardul Kadam

मालन वावळे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही त्याला पाहून आलो. त्याच्या डोक्याला सगळीकडे लागलं आहे. तो कसा पडला की काय झालं? आम्हाला अजून सांगितलेलं नाही. आत्ता पाच तारखेला त्याच्या लहान मुलाचा वाढदिवस झाला. गावी त्याच्या आईला खूप धक्का बसला आहे.”

“या गर्दीचं कोण काय करणार आहे. कोणी काही उपाय करत नाही. कितकच मरुदेत पण सरकार काही दखल घेत नाही,” या शब्दात त्यांनी भावनिक होत प्रतिक्रिया दिली.

तर विकी यांच्या मावशी प्रमिला जाधव म्हणाल्या की, “आम्हाला वाटलं अपघात झालाय. गावाहून फोन आला की, त्याला पहायला जा. आम्हाला वाटलं पडला असेल काही लागलं असेल. पण इथे आल्यावर त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं पाहिलं.”

पुष्पा गवारे अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या 21 वर्षीय भाचीचा फोटो दाखवताना

फोटो स्रोत, Shardul Kadam

विकी यांच्यासह या अपघातात उल्हासनगरचे 23 वर्षीय केतन दिलीप सरोज, राहुल संतोष गुप्ता आणि एका अज्ञात व्यक्तीचा (ओळख अद्याप पटलेली नाही) मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तर इतर 9 जण यात जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये 21 वर्षीय स्नेहा दौंडे यांचा समावेश आहे. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

स्नेहा यांच्या मावशी पुष्पा गवारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “आम्ही तिला पाहून आलो. ती फक्त 21 वर्षांची आहे. ऐरोली इथे कामाला जाते. कामाला जात असतानाच हे झालं. तिनं सांगितलं की, अचानक मुली एका बाजूला फेकल्या गेल्या आणि खाली पडल्या.”

“नेते येतात आणि जातात पण रेल्वेच्या गर्दीचा प्रश्न कोण सोडवणार. जो हा प्रश्न सोडवेल त्याला देवमाणूस म्हणावं लागेल. कारण किती वर्षांपासून अशीच गर्दी असते. याकडे राजकारण्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आज मुलगी आहे उद्या तुमचीही मुलं जाऊ शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं,” असंही त्यांनी म्हटलं.

वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष?

मुंबई लोकल रेल्वेचे दोन भाग आहेत. एक मध्य आणि दुसरी पश्चिम रेल्वे. यातून दररोज सुमारे 63 लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या 12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. परंतु या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी दररोज रेल्वे लोकलमधून प्रवास करत असतात.

मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या दाव्यानुसार, “आजच्या घटनेची पूर्वसूचना आम्ही रेल्वेला दिली होती. दिवा ते कळवा अतिप्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वळणावर ट्रेन झुकते, याबाबतची माहितीही दिली गेली होती. मग रेल्वेने यावर काय कारवाई केली?” असा प्रश्न मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी उपस्थित केला.

ग्राफिक्स

देसाई म्हणाले, “दोन नवीन ट्रॅक बनवले गेले तरी लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याऐवजी मेल एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवल्या. असे निर्णय दिल्लीत घेण्यात येत असल्याने मुंबईतील लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे पहायला यांच्याकडे वेळ नाही.

आम्ही वारंवार रेल्वे बोर्डाकडे याबाबत तक्रारी केल्या आहे. कळवा ते दिवा रेल्वे ट्रॅक आहे तिथे मोठी वळणं आहेत. याबाबत आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं. पण त्यांनी दुर्लक्ष केलं आहे.”

“स्ववयंचलित दरवाजे असावेत, ही मागणी करत आहोत. पण सोपे पर्याय उपलब्ध असताना रेल्वे स्टेशनला रंगकाम करणं, एसी लोकल सुरू करणं असली कामे केली जातात. जी प्राधान्याची कामे आहेत ती केली जात नाहीत,” अशीही टीका त्यांनी केली.

सामान्य मुंबईकर प्रवासी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा मुंबईपासून तास ते दोन तास अंतरावर राहणाऱ्या प्रवाशांनाही गर्दीतून धोकादायक प्रवास करावा लागतो, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे.

राज्य सरकारने काय म्हटलं?

राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली असून यावर या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीसांकडून चौकशी केली आहे. तसंच योग्य ती कायदेशीर कारवाई करत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या लोकलमधून सुमारे 13 प्रवासी खाली पडले होते, यात चार जणांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Shardul Kadam

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.”

“उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, “लोकलमधून प्रवास करणारे 8 व्यक्ती ट्रॅकवर पडले. रेल्वेनं या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.”

“सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. 9 वाजून 50 मिनिटांनी घटनास्थळावर रुग्णवाहिका पोहचली. सर्वांना रुग्णालयात पोहचवण्यात आलं आहे.”

“हे सर्व लोक लोकल ट्रेनच्या फूडबोर्डवर प्रवास करत होते. आता नव्याने येणाऱ्या लोकलमध्ये एसी रेक्स आहेत. त्यात आपोआप दरवाजे बंद होण्याची व्यवस्था आहे. त्यातून अशा घटना होणार नाहीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.”

मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या मागण्या

1. MUTP प्रकल्प मार्गी लावा

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन PPP मॉडेल वर MRVC ची स्थापना झाली. याचा उद्देश MUTP अंतर्गत प्रकल्प मार्गी लावणे प्रकल्पासाठी निधी व्यवस्था करणे, जागेची उल्पब्धता करणे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करणे हा आहे.

तरीही कळवा ऐरोली लिंक, कुर्ला पुढील 5-6 ट्रॅक असे महत्वाचे प्रकल्प रखडलेले आहेत. तसेच अतिरिक्त येणाऱ्या लोकल सुद्धा अजूनही आलेल्या नाहीत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी जागा राज्य सरकारने हस्तक्षेप करून त्वरित रेल्वेच्या ताब्यात द्यावी. रेल्वेने कोणतीही कारणं न देता हे प्रकल्प पूर्ण करावेत.

2. मुंबई लोकलच्या 4 ट्रॅकवर मेल एक्सप्रेसचे अतिक्रमण बंद करा –

कुर्ला ते कल्याण 6 ट्रॅक उपलब्ध आहेत. त्यामध्ये 4 ट्रॅक लोकलसाठी आरक्षित असतानाही रेल्वेतर्फे मेल एक्सप्रेसचे अतिक्रमण करण्यात आलेले आहे.

ठाणे दिवा नवीन ट्रॅक झाल्यावर वास्तविक ठाण्यापर्यंत लोकल वाढविल्या पाहिजे होत्या. पण नवीन ट्रॅकवरही मेल एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. तसेच मेल एक्सप्रेस उशिराने मुंबईत पोहोचतात. त्यांना प्राधान्य देऊन मुंबई लोकल थांबवण्यात येतात त्यामुळे जास्त गर्दी होते.

मुंबई लोकल रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेतून दररोज सुमारे 63 लाख लोक प्रवास करतात.

फोटो स्रोत, Getty Images

3. स्वयंचलित दरवाजे

मुंबई लोकलचे सध्याचे दरवाजे हे लोखंडाचे आहेत. त्यामुळे ते अतिवजनाचे आहेत. त् ऐवजी अल्युमिनियम किंवा इतर हलक्या प्रकारे ते तयार केल्यास लोकलला बसवता येतील.

पण गर्दीच्या वेळी खूप गर्दीमुळं ते बंद होणारच नाहीत त्यामुळे वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण होईल. ती टाळण्यासाठी मेट्रोप्रमाणे रेल्वे स्टेशनवरच स्वयंचलित तिकीट दाखवून प्रवेश देणारे दरवाजे असावेत.

त्यामुळे विनातिकीट प्रवासी, गर्दुल्ले, बेवडे यांवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच प्रत्येक तासाला प्रवासी क्षमतेपेक्षा कित्येक पटीनं जास्त प्लॅटफॉर्म वर येणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवता येईल. सध्या असे कोणतेच नियंत्रण नसल्याने रेल्वे सेवा बंद पडली किंवा विलंबाने झाली तरी प्रचंड प्रमाणात गर्दी प्लॅटफॉर्मवर येते आणि अपघाताची शक्यता निर्माण होते.

4. मुंबई लोकल वेगळे प्राधिकरण असावे –

रेल्वे मुंबईची मग निर्णय घेणारे अधिकारी दिल्लीत का? मुंबई लोकल रेल्वे मेल एक्सप्रेस सेवे पासून वेगळी करून मुंबई मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर सेवा ह्यासाठी वेगळे प्राधिकरण करण्यात यावेत आणि लोकल संदर्भातील निर्णय राज्य पातळीवर घेण्यात यावेत.

अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC