Source :- BBC INDIA NEWS

मुंबई लोकल स्टेशनवरील गर्दी

फोटो स्रोत, Getty Images

9 जून 2025, 12:13 IST

अपडेटेड 1 तासापूर्वी

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या लोकलमधून सुमारे 10 प्रवासी खाली पडले. यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत.

आज (9 जून 2025) सकाळी 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी (8:19) या जलद लोकलमधून प्रवासी खाली पडल्याची घटना घडली.

या घटनेबाबत ठाणे महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि 9 व्यक्तींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेनं काय म्हटलं?

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, “लोकलमधून प्रवास करणारे 8 व्यक्ती ट्रॅकवर पडले. रेल्वेनं या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.”

“सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. 9 वाजून 50 मिनिटांनी घटनास्थळावर रुग्णवाहिका पोहचली. सर्वांना रुग्णालयात पोहचवण्यात आलं आहे.”

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

“हे सर्व लोक लोकल ट्रेनच्या फूडबोर्डवर प्रवास करत होते. आता नव्याने येणाऱ्या लोकलमध्ये एसी रेक्स आहेत. त्यात आपोआप दरवाजे बंद होण्याची व्यवस्था आहे. त्यातून अशा घटना होणार नाहीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.”

मुंबई लोकल रेल्वे

फोटो स्रोत, Getty Images

“जुन्या रेक्समध्ये काही सुधारणा करता येतील यावरही विचार सुरू आहे. यावर रेल्वे बोर्डानं निर्णयही घेतला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही,” अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.”

“उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”

अजित पवार

फोटो स्रोत, Facebook/Ajit Pawar

“मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल’

या घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारा आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अशाच 6 प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.”

विजय वडेट्टीवारांनी 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ठाणे महापालिकेच्या माहितीनुसार, एकाच प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

फोटो स्रोत, Vijay Wadettiwar/Facebook

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाहीत, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाहीत, ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते. अशा मुंबई लोकलच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यग्र असतात.”

“सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा,” अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.

मुंबई रेल्वे प्रवासी संघाकडून कारवाईची मागणी

या घटनेनंतर मुंबई रेल्वे प्रवासी संघाने निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं, “दिवा-कलवा या मृत्यू-मार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मुंब्रा परिसरात आज 10-15 प्रवासी गर्दीमुळे लोकलमधून खाली पडल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देणे गरजेचे आहे.”

मुंबई रेल्वे प्रवासी संघानं पुढे म्हटलंय की, “कल्याण ते ठाणे दरम्यानच्या दोन नवीन मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक लोकल सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन प्रसंगी अधिक लोकल सेवेचे आश्वासन दिले होते. मात्र, डीआरएम यांनी हा निर्णय उलटवून या मार्गांवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले.

“आजची दुर्घटना ही मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या विलंबामुळे लोकल थांबवण्याच्या धोरणामुळे घडली आहे. गर्दी आणि असुरक्षित प्रवास हे या धोरणाचे थेट परिणाम आहेत. आम्ही या प्रशासनाच्या अपयशाचा तीव्र निषेध करतो.”

“या अपघाताची जबाबदारी डीआरएमने स्वीकारावी. रेल्वे बोर्डने मुंबई लोकल रेल्वे व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि स्वतंत्र मुंबई लोकल प्रशासन निर्माण करावे,” अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या मागण्या :

1. जखमींना तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी.

2. कल्याण ते कुर्ला दरम्यान केवळ लोकलसाठी चार मार्ग राखून ठेवावेत.

3. गर्दीच्या वेळेत मेल/एक्सप्रेस गाड्यांना या मार्गांवर चालवले जाऊ नये.

4. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था निर्माण करावी.

मुंबई लोकल जीवघेणं रेल्वे नेटवर्क ठरतंय का?

1925 मध्ये सुरू झालेली ही लोकल रेल्वे सेवा आता 100 वर्षांची झाली आहे.

या रेल्वे नेटवर्कला ‘मुंबईची लाईफलाईन’ असंही म्हटलं जातं, पण “ही लाईफलाईन आता डेथलाईन बनली आहे,” असं प्रवासी म्हणू लागले आहेत.

याचं कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत मुंबई लोकलमधून प्रवास करताना दररोज सरासरी सात जणांचा मृत्यू होतोय. म्हणजे, दर तीन-साडेतीन तासाला एक मृत्यू!

2023 या एकट्या वर्षात या रेल्वे नेटवर्कमध्ये अपघातात 2590 जणांचा मृत्यू झाल्याचं स्वतः रेल्वे पोलिसांचा अहवाल सांगतो. म्हणजेच दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू आणि आजही ही मालिका सुरूच आहे.

मुंबईच्या या लोकलमधून प्रवास करताना जेवढे मृत्यू होतायत, जवळपास तेवढेच प्रवासी जखमीसुद्धा होत आहेत. 2023 या वर्षभरात 2 हजार 441 प्रवासी जखमी झाले आहेत. मे 2022 आणि मे 2024 मध्येही जखमींची संख्या साधारण तेवढीच आहे.

रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की, मृत्यूंची ही संख्या कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई लोकल नेटवर्क कसं आहे?

मुंबई लोकल रेल्वेचे दोन भाग आहेत. यात एक आहे मध्य रेल्वे जी 234 किमी पसरलेली आहे आणि पश्चिम रेल्वे 124 किमीपर्यंत लांब आहे. आणि एका किलोमीटरच्या प्रवासासाठी आकारले जातात फक्त 12 पैसे. म्हणजे भारतीय 1 रुपयाच्या फक्त 12 टक्के.

मुंबईचं भौगोलिक स्थान पाहाता संपूर्ण मुंबईभर प्रवासासाठीचा हा सर्वांत वेगवान आणि परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे लाखो लोक प्रत्येक मिनिटाला या रेल्वेतून प्रवास करत असतात.

या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या दररोज 3204 फेऱ्या दिल्या जातात. ज्यातून जवळपास 63 लाख प्रवासी प्रवास करतात. 63 लाख ही माद्रिद किंवा टोरंटोसारख्या शहरांची एकूण लोकसंख्या आहे. किंवा असंही म्हणता येईल की डेन्मार्क, सिंगापूर, बल्गेरियासारख्या देशांएवढी लोकसंख्या या मुंबई लोकल नेटवर्कमधून रोज ये-जा करते.

मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या 12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. परंतु त्यातून क्षमतेपेक्षा जवळपास दीड टक्के जास्त प्रवासी प्रवास करतात असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पट जास्त आहे. (मुंबई लोकल रेल्वेचे हे फोटो त्यासाठी पुरेसे बोलके आहेत.)

गेल्या 10 वर्षांत रेल्वेत मृत्यू कसे आणि कुठे झाले?

गेल्या दहा वर्षांत कोव्हिड काळातील (2020 आणि 2021) ही दोन वर्षं वगळल्यास मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करताना सरासरी नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं रेल्वे पोलिसांच्याच रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं.

2023 सालच्या अहवालानुसार 12 महिन्यात 2590 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • रेल्वे रुळ ओलांडताना – 1277
  • चालत्या रेल्वेतून पडून – 590
  • नैसर्गिक मृत्यू – 529
  • रेल्वेच्या हद्दीतील आत्महत्या – 121
  • रेल्वे पोलला धडकून- 4
  • प्लॅटफॉर्मच्या गॅप्समध्ये पडून – 10
  • इलेक्ट्रिक शॉक लागून- 14
  • इतर- 32
  • मृत्यूचे कारण माहिती नसलेले – 13

2024 हे वर्ष सुरू झाल्यापासून पहिल्या पाच महिन्यात 1 जानेवारी 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत एकूण 1003 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दरदिवशी सरासरी 6-7 मृत्यू याही वर्षी झाल्याचं स्पष्ट होतं. तर 2022 मध्येही साधारण मृत्यू होणाऱ्यांची संख्या सरासरी तेवढीच आहे.

2013 ते 2021 या आठ वर्षांतही रेल्वेतून दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंचा आकडा फारसा कमी झालेला नाही. 2013 ते 2019 दरम्यान दररोज नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं दिसतं.

2020 आणि 2021 या दोन्ही म्हणजे कोव्हिड काळात लॉकडाऊन दरम्यान प्रवासी संख्या कमी होती यामुळे या दोन वर्षांत मृत्यूंचा आकडा हा दररोज तीन ते चार इतका होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC