Source :- ZEE NEWS

2 Days Work Week भविष्यात सुट्ट्या अधिक आणि काम कमी अशी स्थिती निर्माण झाल्याचं आश्चर्य वाटायला नको. थ्री डेज वीक म्हणजेच आठवड्यातून केवळ तीन दिवस काम करायचं आणि 9 ते 5 अशी ठरलेली नोकरी करायची नाही हा काळ आता फार दूर नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार बिल गेट्स यांनी आर्टिफिशीअल इंटेलिजन्सबद्दल बोलताना या तंत्रज्ञानामुळे कार्यालयांमध्ये अमुलाग्र बदल होईल असं म्हटलं आहे. पुढील 10 वर्षांमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचे केवळ दोन दिवस असतील आणि पाच दिवस सुट्टीचा आनंद घेता येईल असंही गिट्स यांनी म्हटलं आहे.

लोकांना बराच मोकळा वेळ मिळणार

जिमी फॅलॉनच्या ‘द टूनाईट शो’मध्ये बिल गेट्स सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी एआय तंत्रज्ञानाबद्दल सूचक विधान केलं आहे. एआय एवढ्या वेगाने विकसित होत आङे की पुढील दहा वर्षांमध्ये मशिन्सच बहुतांश गोष्टी हाताळतील. सध्या ज्या गोष्टी मानव करत आहे त्यापैकी अनेक मशिन्सच करतील, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असल्याने लोकांना बराच मोकळा वेळ मिळणार आहे. यामध्ये त्यांना क्रिएटीव्ह कामं करता येतील. आठवड्यातील पाच दिवस रिकामे मिळतील, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. 

लवकरच चित्र बदलणार

सध्याच्या आधुनिक समाजाला मागील काही काळापासून पाच दिवसांचा आठवडा खुणावत आहे. मात्र आजही जगभरामध्ये सर्वांना आठवड्यातील 40 तास काम कराव लागते. मात्र लवकरच हे चित्र बदलणार असल्याचे संकेत गेट्स यांनी दिले आहेत. 

बराच बदल होणार पण अडचणीही येणार

सध्या मानव बजावत असलेल्या अनेक भूमिका भविष्यात एआयकडे जातील. एआय केवळ पर्याय म्हणून राहणार नाही तर ते कर्मचाऱ्यांची जागा घेईल. अगदी निर्मिती, लॉजिस्टीक, आरोग्य विषयक क्षेत्र, शिक्षण सर्वच क्षेत्रात हे दिसून येईल, असा अंदाज गेट्स यांनी व्यक्त केला आहे. “आपल्याकडे डॉक्टरांची संख्या कमी आहे. मानसिक आरोग्यविषय तज्ज्ञांची संख्या कमी आहे यासारख्या अडचणी एएआयच्या माध्यमातून सुटतील. मात्र त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळे बरेच बदलही आपल्याला स्वीकारावे लागतील,” असंही गेट्स म्हणाले. 

एएआयची बुद्धीमत्ता ही मानवी बुद्धीमत्तेपेक्षा अधिक सरस

नोकऱ्यांची व्याख्याच एआयमुळे बदलेलं अशी शक्यता बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे. त्यावेळेस आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसांचा कामाचा आठवडा असेल. या कालावधीमध्ये एआयची भूमिका पूर्णपणे बदललेली असेल. वेळ, प्रोडक्टीव्हिटी आणि पर्सनल अपेक्षा पूर्ण करण्यासारख्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल, असंही गेट्स म्हणाले. भविष्यात सर्वच क्षेत्रांमध्ये एएआयची बुद्धीमत्ता ही मानवी बुद्धीमत्तेपेक्षा अधिक सरस ठरेल. मात्र हा बदल होताना काही अडचणी नक्कीच येतील असंही गेट्स आवर्जून म्हणाले. “आपण सर्वकाही ठरवू. उदाहरणार्थ कंप्युटर्सने बेसबॉल खेळताना पाहण्यात काही अर्थ नाही. तर अशावेळी आपण काही गोष्टी स्वत:साठी राखीव ठेऊ. मात्र गोष्टींची निर्मिती, त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे, अन्नधान्य पिकवणे या सारख्या गोष्टींसाठी एआयचा वापर होईल,” असं गेट्स म्हणाले.  

मानवाचं काय होणार?

आता एआय मानवाची जागा घेणार म्हटल्यावर जे आज या नोकऱ्या करतात त्यांचं काय होणार? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. स्वयंघोषित ‘एआयचा गॉडफादर’ असलेल्या जेफरी हिल्टन यांनी आर्थिक दरी भविष्यात वाढत जाईल आणि एआयची कंत्राटं ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे संपत्ती एकवटेल असं भाकित व्यक्त केलं आहे. गेट्स यांनाही असेच विधान करताना भविष्यात नोकरी नसली तरी लोकांना पाठबळ देणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे, असं गेट्स यांनी यापूर्वीच म्हटलं आहे.

SOURCE : ZEE NEWS