Source :- ZEE NEWS

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्याने दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू नदीचं पाणी रोखलं असून, हवाई क्षेत्रही त्यांच्या विमानांसाठी बंद केलं आहे. दरम्यान दोन्ही देशातील राजकीय नेते यावरुन एकमेकांना इशारा देताना दिसत आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीचा (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टा याने याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विधान केलं आहे. 

पहलगाम हल्ल्यासंदर्भात खोटे आरोप करुन, पाकिस्तानचं पाणी रोखण्यात आल्याचा आरोप बिलावल भुट्टोने केला आहे. पण आम्ही असं होऊ देणार नाही असा इशाराही त्याने दिला आहे. बिलावलने भारताला युद्धाची धमकी देत म्हटलं आहे की, “पाकिस्तानविरोधात पुरावे द्या, अन्यथा आरोप करणं बंद करा. जर भारताने एकतर्फीपणे सिंधू करार तोडण्यासाठी पुढाकार घेतला तर नदीत रक्त वाहील”. 

पाकिस्तानचा माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने गुरुवारी सिंध प्रांतातील मिरपूर खास येथे एका कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. बिलावलने नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘गुजरात का कसाई नरेंद्र मोदी’ असा केला. सिंधू नदीला गुजरातच्या कसाईच्या हाती मरु देणार नाही असं त्याने म्हटलं. 

‘सिंधूचं पाणी रोखलं, तर युद्ध होईल’

बिलावल भुट्टो सभेत म्हणाला की, “पाकिस्तानचा यात काही सहभाग नाही हे आम्ही स्पष्ट केलं आहे. जर तुम्हाला पहलगाम हल्ल्याच्या मागे कोण आहे हे माहीत असेल तर पुरावे द्या. जर ते लोक पाकिस्तानात असतील तर आम्ही कारवाई करु. पण जर तुम्ही पहलगामच्या नावे सिंधूचं पाणी रोखलं तर तुम्हाला उत्तरासाठी तयार राहावं लागेल. पाकिस्तानला युद्ध नको आहे, पण कोणत्याही आक्रमणाला ताकदीने उत्तर देऊ. आम्ही नरेंद्र मोदींना सिंधू नदीवर हल्ला करु देणार नाही”.

काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जे निर्णय घेतले आहेत, त्यात सिंधु नदी कराराचा सहभाग आहे. यानंतर याविरोधात पाकिस्तानकडून सतत विधानं केली जात आहेत. पाकिस्तानमधील नेते, मंत्री भारताने सिंधू करार तोडणं युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे असं सांगत आहेत. 

काय आहे सिंधू करार?

सिंधू पाणी करार भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी विभागतो. या करारात सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. अनेक युद्धे होऊनही भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू करार सुरू आहे. पहलगामनंतर, भारताने मात्र पाणी रोखण्याचं ठरवलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS