Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत विमानात उपस्थित असलेल्या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचं स्वरूप पाहता मृतदेहांची ओळख पटवणं हे सुद्धा एक आव्हानात्मक झालं आहे.
मृतांची ओळख पटवण्यासाठी Deoxyribonucleic acid म्हणजे DNA अॅनालिसिसचा वापर करण्यात आला.
बहुतांश वेळेला अशा प्रकारची विमान दुर्घटना, बॉम्ब स्फोट, इमारतीला आग लागल्याची घटना, रहिवासी इमारत कोसळणे, इत्यादी अशा घटनांमध्ये जिथे मृतदेह जळालेला असो वा अनेक भागांमध्ये आढळतो. अशा परिस्थितीत मृतदेहाची ओळख पटवून तो संबंधितांकडे सुपूर्द करणं हे एक मोठं आव्हानात्मक काम असतं.
अशा दुर्घटनांमध्ये मृतदेह कसा ओळखला जातो? यासाठी सरकारी यंत्रणा कोणत्या पद्धती आणि प्रक्रिया वापरतात? आणि DNA चाचणी करून मृतदेहाची ओळख कशी पटवली जाते? या प्रश्नांची उत्तरे आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मोठ्या दुर्घटनेत मृतदेहाची ओळख कशी पटवली जाते?
कोणत्याही मोठ्या दुर्घटनेत मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम जिकरीचं असतं असं मुंबईतील नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितलं.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोणत्या प्रक्रिया असतात हे समजावून सांगताना डॉ. मोहिते म्हणाले, “यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. अशा घटनेत सगळ्यात आधी आम्ही पुरुष, महिला आणि बालके असे मृतदेह वेगळे केले जातात. चेहरा व्यवस्थित आहे आणि तो ओळखता येण्यासारखा असल्यास असे मृतदेह अर्थात कुटुंबीयांना दाखवले जातात आणि ओळख पटवली जाते,” असं ते म्हणाले.
अहमदाबादसारख्या घटनेत जिथे शरीर जळालेलं आहे, चेहरा ओळखण्यापलीकडे गेलेला आहे, अशा घटनांचं उदाहरण देताना इतर प्रक्रिया वापरल्या जातात, असं डॉ. मोहिते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, “यात शरीरावरील वैशिष्ट्य, उदाहरणार्थ, शरीरावरील टॅटू, एखाद्या जुन्या ऑपरेशनची खूण, शरीराची लांबी, जडण-घडण, केस, शरीरावरील दागिने, इत्यादी गोष्टी. यावरून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो.”
यानंतर “जे मृतदेह जळालेले आहेत किंवा विविध पार्ट्समध्ये सापडतात. यात दात तपासता येतात. दातांच्या जबड्यावरून सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न होतो. शरीरात इम्प्लांट झालेलं असेल, काही शस्त्रक्रिया असेल तर यावरूनही ट्रेस करता येतं,” असं ते सांगतात.
DNA प्रक्रियेचा वापर मृतदेह ओळखण्यासाठी कसा केला जातो?
अहमदाबाद येथील घटना असो वा यांसारख्या दुर्घटना ज्यात मोठ्या संख्येने लोकांचे बळी गेले आहेत आणि चेहऱ्यावरून किंवा ओळख पटवण्यासाठी ठोस पुरावा वरवर दिसत नाहीये, अशा प्रकरणांमध्ये DNA विश्लेषण करून मृतदेहाची ओळख पटवली जाते, असं डॉ. मोहिते सांगतात.
ते म्हणाले, “DNA प्रक्रिया करण्याकरता मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्यास दात, दाढा हे DNA साठी महत्त्वाचे स्रोत आहेत.”

“मांडीचं हाड, छातीचं हाड, केस याचाही उपयोग DNAसाठी करता येतो. मसल मास जर जळालं नसेल आणि प्रिजर्व केलेलं असेल तर त्याद्वारेही DNA चाचणी करता येते. DNA घरातल्या संबंधित व्यक्तींशी मॅच होणं ही यानंतरची प्रक्रिया असते,” असंही डॉ. मोहिते सांगतात.
DNA चाचणी करण्याचा निर्णय कधी घेतला जातो?
ओळख पटवण्यासाठी इतर कोणतेही पर्याय नसतील त्यावेळी DNA चाचणी केली जाते. ज्यावेळी एखाद्या दुर्घटनेत शरीर छिन्नविछिन्न झालेलं असेल, जेव्हा शरीराचे पार्ट्स वेगवेगळे सापडतात, ते कोणाचे आहेत यामुळे प्रत्येक पार्टची DNA चाचणी वेगळी करावी लागते, असं डॉ. मोहिते सांगतात.
कोणत्याही कुटुंबाला मृतदेह सुपूर्द करत असताना त्यांच्या कुटुंबीयाचा मृतदेह एकाच व्यक्तीचा असावा, यासाठी मिळालेल्या प्रत्येक भागाचा DNA केला जातो. फॉरेन्सिक लॅबमध्ये बायोलॉजिकल विंगच्या माध्यमातून DNA चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते, असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, “DNA चाचणी करताना आपल्याला चाचणी करायची आहे तो नमुना आणि ज्याच्याशी जुळवून पाहायचं आहे त्या दोन नमुन्यांची तुलना केली जाते. ते जुळतात होतात का हे पाहिलं जातं. DNAसाठी कुटुंबीयांपैकी ज्यांच्याशी DNA जुळवून पाहायचा आहे त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात.”
दुर्घटनांच्या वेळी अनेक गोष्टी एकाच वेळी घडत असतात. त्या ठिकाणचे वातावरण, पोलीस तपास, प्रशासकीय प्रक्रिया यामुळे ओळख पटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या DNA चाचणीवेळी अनेक आव्हानांचा सामना तज्ज्ञांना करावा लागतो, त्यामुळे कधीकधी या प्रक्रियाला वेळ लागतो असं डॉ. मोहिते सांगतात.
DNA चाचणी कशी केली जाते?
DNA चाचणी ही फॉरेंसिक लॅबमध्ये केली जाते.
DNA म्हणजे आपण घर बांधताना आर्किटेक्टकडून नकाशा काढून आणतो ज्याला आपण ब्लू प्रिंट म्हणतो. शरीराची ब्लू प्रिंट म्हणजे DNA. आपण आपले आईकडचे, वडिलांकडचे नातेवाईक या DNA चाचणीद्वारे ओळखू शकतो, असं मुंबई फॉरेंसिक सायन्स लॅबचे माजी संचालक डॉ. कृष्णा कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
DNA चाचणी किंवा विश्लेषण (analysis) बाबत माहिती देताना डॉ. कुलकर्णी सांगतात, “DNA तीन प्रकारचे असतात. एक्स क्रोमोजोमल DNA, वाय क्रोमोजोमल DNA आणि एक एक्सवाय क्रोमोजोमल DNA.”

डॉ. कुलकर्णी सांगतात, “एक्सवाय क्रोमोजोमल DNA ओळखण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केलं जातं. 50 टक्के आईकडून आणि 50 टक्के वडिलांकडून यानुसार DNA असतो.
“दुसरं आहे एक्स क्रोमोजोमल DNA म्हणजे मायटोकॉन्ड्रिअल DNA. यात फक्त आईकडचे नातेवाईक चाचणीसाठी उपलब्ध आहेत पण वडिलांकडचे नातेवाईक नाहीत, अशा वेळी नातेवाईक नसतील मॅच क एक्स क्रोमोजोमल DNA चाचणी केली जाते.
“तिसरं आहे वाय क्रोमोजोमल DNA. यात लैंगिक छळाच्या केसेस जेव्हा घडतात तेव्हा हा DNA केला जातो किंवा वडिलांकडील नातेवाईक ओळखण्यासाठीही केला जातो.”
प्लेन क्रॅशसारख्या दुर्घटनेत आधी स्वॅप कलेक्ट करून पहिल्यांदा एक्सवाय क्रोमोजोमल DNA आई-वडिलांशी जुळतं का हे पाहिलं जातं. हे नसेल तर वाय क्रोमोजोमलला त्याचे भाऊ, काका, आजोबा यांच्याशी जुळतं का पाहिलं जातं, मग आईच्या नातेवाईंकाशी जुळतं का हे तपासलं जातं.
DNA चाचणी अशी आहे की आपण याद्वारे 100 टक्के सांगू शकतो की हा यांचा मुलगा आहे किंवा भाऊ आहे, असं डॉ. कुलकर्णी सांगतात.
कोणत्याही दुर्घटनेत मृतदेह जळालेला असल्यास DNA चाचणी करण्यासाठी कोणती आव्हानं येतात?
यासंदर्भात बोलताना डॉ. कुलकर्णी असं सांगतात, “DNA एक्स्ट्रॅक्शन पहिल्या टप्प्यात लगेच होत नाही, मग त्यावेळेस आपल्याला मायटोकॉन्ड्रिअल DNA हा दुसरा पर्याय असतो. यामुळे अशा केसेसमध्ये DNAच्या वेगवेगळे तंत्र वापरावे लागते.
“एक्सवाय आणि वाय क्रोमोजोमल DNA हा न्यूक्लिअर DNAमध्ये मिळतो आणि एक्स क्रोमोजोमल DNA हा मायटोकॉन्ड्रिअल DNAमध्ये मिळतो. एकात निकाल मिळाला नाही तर दुसरे तंत्र वापरावे लागते त्यासाठी 72 तासांचा कालावधी लागतो,” असं डॉ. कुलकर्णी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या रक्त, केस किंवा हाडे यांच्यातून DNA कसा तपासला जातो, याबाबत डॉ. कुलकर्णी सांगतात की “ज्या नमुन्यातून DNA वेगळा केला जातो त्याला DNA एक्स्ट्रॅक्शन म्हटले जाते. आधी रासायनिक पद्धतीने हे केलं जायचं पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. त्याला PCR ( पॉलीमराईज चेन रिअॅक्शन) म्हटलं जातं. यानंतर जेनेटिक अनालायजर ही टेक्निक आहे. आपण भारतात एकूण 16 लोकसचा अभ्यास करतो. लोकस म्हणजे जीन्सची ठराविक स्थिती.”
मृतदेहाचे वेगवेगळे भाग सापडले असतील तर DNA चाचणी करता येते का?
यासंदर्भात बोलताना डॉ. कुलकर्णी सांगतात, “प्रत्येक भागाचा वेगळा DNA केला जातो. पण केसापासून ते दात आणि पेशींपर्यंत संपूर्ण शरीरात एकच DNAअसतो. कसंही DNA विश्लेषण, कुठेही केलं तरी DNA समानच मिळणार. म्हणून याला युनिक म्हणतात. यात आयुष्यभर बदल होत नाही. रक्त, लाळ, दात, केस, हाड कशाचीही चाचणी केली तरी DNA पॅटर्न हा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एकच राहतो.”
ते पुढे सांगतात, “अशी एखादी घटना ज्यात मृतदेह पूर्ण जळालेला असेल म्हणजे राख झाली असल्यास मग मात्र राखेची DNA चाचणी करता येत नाही. मग अशा केसेसमध्ये इतर बाबींचा शोध घेत मृतदेह ओळखण्यासाठी प्रयत्न केले जातात.”
‘DNA रिपोर्ट आधीच काढून ठेवल्यास मदत होईल’
आंतरराष्ट्रीय प्रवासाआधी DNA रिपोर्ट करुन त्याची माहिती सेव्ह करुन ठेवायची असा उपाय डॉ. कुलकर्णी सुचवतात.
“DNA चाचणीसाठी पूर्वी 15-16 हजार रुपये खर्च येत असे. आता हा खर्च 5-6 हजार रुपयांपर्यंत कमी झालेला आहे. किमान आंतरराष्ट्रीय प्रवास करताना नागरिकांनी DNA चाचणी करून जाता येईल, याची सॉफ्ट कॉपी संबंधित एअर कंपन्यांना देता येईल. पुढे मृत्यू झाला, दुर्घटना झाली किंवा सापडत नाही अशा केसेसमध्ये संबंधितांच्या DNA रिपोर्ट यंत्रणेकडे राहील. याचे रेकॉर्ड राहतील,” असं डॉ. कुलकर्णी यांना वाटतं.
“मृतदेहाची DNA टेस्ट करावीच लागेल पण नातेवाईक पोहचेपर्यंत काम थांबलेलं राहणार नाही किंवा नातेवाईक मिळाले नाहीत किंवा आले नाहीत तरी मृतदेहाची ओळख पटवता येऊ शकते. समजा, हाच अपघात किंवा कोणताही अपघात हा विदेशात घडला असता तर कुटुंबाला तिथे पोहचेपर्यंत DNA टेस्ट करता आली नसती. पण DNAचा रिपोर्ट हा संबंधित संस्थेकडे किंवा यंत्रणेकडे नोंद असेल तर किमान संबंधित मृतदेहाची ओळख पटवली जाऊ शकते,” असं डॉ. कुलकर्णी सुचवतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC