Source :- BBC INDIA NEWS

राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, प्रतिनिधी
  • Role, बीबीसी न्यूज मराठी
  • 7 जून 2025

    अपडेटेड 4 तासांपूर्वी

‘महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरीनं एवढी खालची पातळी गाठली की, अंदाज लावणं कठीण आहे,’ असं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ‘मॅचफिक्सिंग’ असल्याचाही आरोप केला. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

‘जनतेनं ज्यांना नाकारले, तेच जनादेशाला नाकारतात,’ असं म्हणत फडणवीसांनी गांधींवर पलटवार केला आहे.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हटलं होतं, “मॅचफिक्सिंग करणारा संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थांवरील विश्वासाला कायम तडा जातो.”

तसंच, “निवडणुकीतली मॅचफिक्सिंग कोणत्याही लोकशाहीसाठी एखाद्या विषासारखी असते” असंही राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींनी ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘लोकसत्ता‘सह भारतातील अनेक वृत्तपत्रांमध्ये विस्तृत लेख लिहून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप नोंदवलाय. महाराष्ट्राच्या या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचं म्हणत, राहुल गांधींनी ‘हेराफेरीचे पाच टप्पे’ दिलेत.

या लेखानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तसंच, महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर या लेखात राहुल गांधी काय म्हणाले, त्यांनी नेमके काय प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तरं दिली हे पाहूया.

राहुल गांधींचे 5 प्रश्न आणि फडणवीसांची 5 उत्तरं

“2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील हेरफेरीचे प्रमाण इतके भयावर होते की, त्यावर पांघरूण घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही अधिकृत आकडेवारीतूनच स्पष्ट पुरावे समोर आलेले आहेत,” असं म्हणत राहुल गांधींनी आकडेवारीयुक्त 5 आरोप केले आहेत. ते आपण क्रमानं पाहूया.

1. राहुल गांधींचा पहिला आरोप आणि फडणवीसांचं उत्तर

राहुल गांधींनी पहिला आक्षेप नोंदवलाय तो निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवरच.

राहुल गांधी म्हणतात, “पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघेच ‘दोनास एक’ अशा पद्धतीने निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी सोय ‘निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा 2023’नुसार करण्यात आली होती. यातलं तिसरं मत म्हणजे विरोधी पक्षाचं मत निष्प्रभ ठरवणं कधीही शक्य होतं.”

निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या प्रक्रियेतील सरन्यायाधीशांचे स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णयच संशयास्पद होता, असं राहुल गांधी म्हणतात.

राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, ‘भारत जोडो अभियान देशातील सर्व संवैधानिक संस्थांच्या बाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाबाबत देखील असंच केलं गेलं.”

“1950 पासून नवीन कायदा येईस्तोवर काँग्रेस सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त नेमताना थेट नियुक्त्या केल्या. आतापर्यंत 26 पैकी 25 आयुक्त काँग्रेसनेच नेमले आहेत. पहिल्यांदाच मोदींनी या नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली.’

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

2. राहुल गांधींचा दुसरा आरोप आणि फडणवीसांचं स्पष्टीकरण

राहुल गांधींचा दुसरा आरोप बोगस मतदारयादींसंदर्भातला आहे. या आरोपात राहुल गांधींनी काही आकडेवारी समोर ठेवली आहे. ती अशी :

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंख्या – 8 कोटी 98 लाख

2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदारसंख्या – 9 कोटी 29 लाख

2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंख्या – 9 कोटी 70 लाख

अशी आकडेवारी देत, राहुल गांधींनी प्रश्न विचारलाय, “2019 ते 2024 पर्यंत म्हणजे 5 वर्षांत 31 लाख मतदार वाढले, मग 2024 मधील लोकसभा ते विधानसभा या दोन निवडणुकींच्या 5 महिन्यांच्या अंतरात 41 लाख कसे वाढले?”

राहुल गांधी

फोटो स्रोत, Facebook/Rahul Gandhi

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधींचा आक्षेप आहे की, 2019 ते 2024 पर्यंत म्हणजे 5 वर्षांत 31 लाख मतदार वाढले, मग 2024 मधील लोकसभा ते विधानसभा या दोन निवडणुकींच्या 5 महिन्यांच्या अंतरात 41 लाख कसे वाढले?”

“युवा मतदारांची संख्या ही सतत वाढत असते. या 40 लाख 81 हजार 229 मतदारांपैकी 26 लाख 46 हजार 608 मतदार हे युवा होते.”

“निवडणूक आयोगाने याबाबत 24 डिसेंबर 2024 रोजी आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचं पत्र पाठवलं आहे. राहुल गांधींनी ते पत्र मिळवून वाचावे.”

फडणवीस पुढे म्हणाले, “2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार, 2004 ते 2009 या काळात 1 कोटी मतदार नवीन जोडले गेले.”

“2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं नाही. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी हवी असेल, तर 2004 लोकसभेपेक्षा विधानसभेत 5 टक्के अधिक मतदान आहे.”

“2009 मध्ये 4 टक्के, 2014 मध्ये 3 टक्के, 2019 मध्ये 1 टक्का आणि 2024 मध्ये 4 टक्के अधिकचं मतदान विधानसभेला झालं आहे.”

3. राहुल गांधींचा तिसरा आरोप

मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

“निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा ती 66.05 एवढी होती.”

ही आकडेवारी देत राहुल गांधी प्रश्न उपस्थित करतात, “अंतिम आकडेवारीत 7.83 टक्क्यांचे म्हणजे सुमारे 76 लाख मतदारांची वाढ अभूतपूर्व होती.”

याबाबत फडणवीसांनी लिहिलं, “शेवटच्या तासात वाढलेली टक्केवारी समजून घ्यायची असेल, तर मतदान समजून घ्यावं लागेल. दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतकं मतदान झालं आहे. त्यामुळे शेवटच्या एक तासात 7.83 टक्के एवढी वाढ झालेली आहे.”

“यात आपण नवीन काय सांगत आहोत? सायंकाळी 5 ते 6 हीसुद्धा मतदानाची वेळ आहे. 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो.”

“असं फक्त महाराष्ट्रातच घडलेलं नाही, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील शेवटच्या तासात मतदान वाढलेलं होतं. आधी रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी यायची. आता ती 5 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

4. राहुल गांधींचा चौथा आरोप

बोगस मतदानाचा मुद्दाही राहुल गांधींनी या लेखातून उपस्थित केला आहे.

राहुल गांधींचा आरोप आहे की, “महाराष्ट्रात सुमारे 1 लाख मतदान केंद्रं आहेत. यापैकी लोकसभा निवडणुकीत जिथं भाजपची कामगिरी निराशाजनक होती, त्या 85 मतदारसंघातील सुमारे 12 हजार केंद्रांवरच वाढीव मतदारांची संख्या जास्त होती.”

विशेष म्हणजे, या 85 जागांपैकी बहुतांश जागा भाजपप्रणित एनडीएनं जिंकल्या, असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

यावेळी राहुल गांधींनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलंय.

राहुल गांधींच्या दाव्यानुसार, कामठीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1 लाख 36 हजार मतं, तर भाजपला 1 लाख 19 हजार मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 1 लाख 34 हजार मतं मिळाली. म्हणजे, लोकसभेच्या मतांच्या आसपासच.

भाजपला मात्र विधानसभेत 1 लाख 75 हजार मतं मिळाली. भाजपच्या मतांमध्ये थेट 56 हजार मतांची वाढ झाली. विशेष म्हणजे, कामठीत केवळ 35 हजार नव्या मतदारांची वाढ झालीय.

राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या नागपुरातील कामठी मतदारसंघातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विद्यमान आमदार आहेत.

महाराष्ट्रातील महायुती सरकार

राहुल गांधींच्या या आरोपांबाबत फडणवीस त्यांच्या लेखात म्हणाले, “याचा हिशोब मी आधीच लेख लिहून दिलेला आहे. सायंकाळी 6 नंतर 17 लाख 70 हजार 867 एवढं मतदान झालेलं आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदान केंद्रांवर प्रतिमिनिट 97, 103.32 एवढं मतदान झालेलं आहे.”

“त्यामुळे जे मतदान संध्याकाळी 6 नंतर झालं आहे त्याची सरासरी काढली, तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंद एवढा आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले, पण जे उदाहरण त्यांनी दिलं नाही तर मी देतो.”

“माढ्यात 18 टक्के वाढ झाली. तिथे शरद पवारांचा उमेदवार जिंकला, वणीत 13 टक्के वाढ झाली तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला तिथे 12 टक्के वाढ झाली.”

5. राहुल गांधींचा पाचवा आरोप

निवडणूक आयोगानं विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर मौन बाळगल्याचा आरोप राहुल गांधींनी या लेखातून केलाय.

“2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या छायाचित्रे असलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विनंती आयोगानं थेट फेटाळून लावल्या,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, “उच्च न्यायालयाने मतदान केंद्रातील मतदानाची व्हीडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारनं निवडणूक आयोगाशी ‘सल्लामसलत’ करून सीसीटीव्हीसारखे रेकॉर्ड उपलब्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आचार नियम कलम 93 (2) (अ) मध्ये सुधारणा केली.”

राहुल गांधी कोर्टाचा आदेश आणि केंद्राची कायद्यातील सुधारणा या दोन्ही गोष्टींच्या वेळांबाबत शंका उपस्थित करतात.

राहुल गांधींच्या या पाचही आरोपांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

निवडणूक आयोगावर लावलेल्या या आरोपांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी सातत्याने जनादेशाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान करत आहेत. निवडणूक आयोग त्यांचं उत्तर देईलच, पण अशा आरोपांमधून काँग्रेस आणखीन गर्तेत जाणार आहे.”

“सातत्याने आरोप करून आपण आपल्या देशाला कोणत्या दिशेने नेत आहोत याचा विचार त्यांनी करावा. महाराष्ट्रातला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असला, तरी सतत राज्यातल्या लाडक्या बहिणी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करत असाल, तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.”

माहिती व जनसंपर्क संचालनालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “भारत निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत. विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.”

निवडणूक आयोगानं दिलं उत्तर

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.

निवडणूक आयोगानं आपल्या उत्तरात म्हटलं, “महाराष्ट्राच्या मतदार यादीविषयी केलेले निराधार आरोप कायद्याच्या राज्यावर आघात करणारे आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजीच काँग्रेस पक्षाला दिलेल्या उत्तरात सर्व तथ्ये स्पष्ट केली होती.”

“ही सर्व माहिती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे दिसते की, या सर्व तथ्यांकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुन्हा असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.”

“कोणीही चुकीची माहिती पसरवणे हे केवळ कायद्याचा अपमान नाही, तर स्वतःच्या राजकीय पक्षाने नेमलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारे आहे. तसेच निवडणुकांदरम्यान निःस्वार्थपणे आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारे आहे. मतदारांनी अनुकूल निकाल दिला नाही म्हणून निवडणूक आयोगावर ‘तडजोड’ झाल्याचा आरोप करणे हे पूर्णपणे हास्यास्पद आहे,” असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

यापूर्वीही जेव्हा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातल्या ‘वाढलेल्या मतांच्या टक्केवारी’वर आणि ‘वाढलेल्या मतदारसंख्ये’वर प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावेळी निवडणूक आयोगानं आरोप फेटाळत, काँग्रेसच्या आरोपांना ‘आधारहीन’ आणि ‘दिशाभूल करणारे’ म्हटले होते.

राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपनं काय म्हटलं?

राहुल गांधींचा लेख शनिवारी (7 जून) अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यावर सत्ताधारी भाजपकडून प्रतिक्रिया आली.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघाचंच उदाहरण राहुल गांधींनी ‘बोगस मतदारां’संबंधी आरोपांच्या मुद्द्यात दिलं.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “खरंतर काँग्रेसनं आत्मपरीक्षण करायला हवं होतं. लोकसभेला 31 जागा त्यांना मिळाल्या आणि 17 आम्हाला मिळाल्या. त्यावेळी राहुल गांधी आणि महाविकास आघाडी ओव्हरकॉन्फिडंट झाली. त्यामुळे निवडणूक लढण्याचं काम असतं, जनसंवाद असतो, घरोघरी जाणं असतं, ते विसरले. मग महाराष्ट्रानं मोदींच्या कामावर विश्वास ठेवला.”

चंद्रशेखर बावनकुळे

फोटो स्रोत, FACEBOOK/CHANDRASHEKHAR BAWANKULE

बावनकुळेंनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आकडेवारी सादर केली.

बावनकुळे म्हणतात, “महाविकास आघाडीला लोकसभेला 2 कोटी 50 लाख मतं मिळाली होती आणि 2 कोटी 48 लाख मतं महायुतीला मिळाली होती.”

“आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी विधानसभेला आम्ही 3 कोटी 17 लाखांवर गेलो, तर महाविकास आघाडी 2 कोटी 17 लाखांवर आले. म्हणजे, राहुल गांधींना कळायला पाहिजे की, त्यांचे लोकसभेच्या तुलनेत 33 लाख मतं कमी झाली. राहुल गांधींनी याचा अभ्यास केला पाहिजे.”

“आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही,” असंही बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधींचे लेख शेअर करत म्हटलं, “निवडणूक चोरीचा संपूर्ण खेळ समजून घ्या.”

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता, हे समजणे कठीण नाही. पण हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी आहे. फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकू शकतो, परंतु, हा खेळ जनतेचे नुकसान करतो आणि निकालावरील जनतेचा विश्वास नाहीसा करतो.”

तसंच, “सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःचा न्यायनिवाडा करा. उत्तरे मागा. कारण महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तिथे. मॅच फिक्स्ड निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी घातक असतात,” असंही सपकाळ यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

आम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले असताना भाजप उत्तरं का देतंय? म्हणजे काहीतरी गडबड आहे, असं सपकाळ पत्रकार परिषदेत म्हणाले.

“वाढलेलं मतदान कुठून आलं? हे वाढलेलं मतदार अनौरस आहे, कारण या मतदानाचे मायबाप नाहीत,” असंही सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ

फोटो स्रोत, X/@INCMaharashtra

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी मतदानाच्या घोटाळ्याचा प्रश्न आकडेवारीसह मांडला आहे, हा आरोप नाही तर तथ्य व आकडेवारीसह त्याची मांडणी करून चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील दीड तासाच्या भाषणात यावर चकार शब्दही काढला नाही. हा लोकशाही व्यवस्थेवर निर्माण झालेला गंभीर व चिंताजनक मुद्दा आहे.

“काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडेही हा मुद्दा सविस्तरपणे मांडला, पण त्यांनी खुलासा करून वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नियमातच बदल करून व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि CCTV फुटेज व माहिती देता येणार नाही असा नवा फतवा काढला आहे, हा लोकशाहीवरचा घाला आहे. काही गौडबंगाल नाही तर माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.”

तसंच, “निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे हे लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस 12 जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे. गडचिरोली येथील मोर्चात आपण सहभागी होत आहोत,” असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेसनं यापूर्वीही नोंदवलेले आक्षेप

राहुल गांधी आणि काँग्रेसनं यापूर्वीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप नोंदवला होता. यापूर्वी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत काही मागण्या केल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे,

1. निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी सार्वजनिक का करत नाही?

2. लोकसभा निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मतदार कुठून आले?

3. नवीन मतदार नोंदणीचे पुरावे द्यावेत.

4. हा निकाल मान्य नसून, हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने यावर स्पष्टीकरण द्यावं.

यापूर्वी जेव्हा काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर आक्षेप नोंदवले होते, तेव्हा बीबीसी मराठीनं तत्कालीन अतिरिक्त निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्याशी बातचित केली होती. तसंच, संगणकतज्ज्ञ माधव देशपांडे यांच्याशी बातचित केली होती.

SOURCE : BBC