Source :- ZEE NEWS

India attacks Pakistan: नियंत्रण रेषेवरील नागरी ठिकाणांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताने गोळीबार न करता धडा शिकवलाय. यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाब नदीची मदत घेतलीय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने नद्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता हे दरवाजे अचानक उघडत भारताने पाकिस्तानला दणका दिलाय. 

गुरुवारी बगलियार आणि सलाल धरणांचे पूरदरवाजे उघडण्यात आले. यानंतर पाकिस्तानच्या विविध भागात पूर आला. सीमावर्ती भागातील त्यांच्या लष्करी कारवायांवरही याचा परिणाम झालाय. गेल्या 5 दिवसांत भारताने पाणी हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. रविवारी याआधी भारत सरकारने चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला होता. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचे विविध जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आले होते.

असे असताना भारताने दुसऱ्या दिवशी सोमवारी पाणी सोडले. ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रीपासून भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला. यात एक सैनिक शहीद झाला तर 14 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. जवळपास 100 नागरिक जखमी झाले आहेत. 

संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काल रात्री रियासीच्या दोडा-किश्तवारमध्ये मुसळधार पाऊस पडला. बगलियार आणि सलाल धरणातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी आणि राखण्यासाठी बांधलेले दोन अतिरिक्त दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे रियासीच्या खाली अखनूरमध्ये पाण्याची पातळी 20 फुटांपेक्षा जास्त वाढली आहे.यामुळे अखनूरच्या खाली असलेल्या पाकिस्तानी भागात पूर परिस्थिती निर्माण झालीय’. 

चिनाब पाणलोट क्षेत्रात असलेल्या गढखल आणि परगवाल सेक्टरमधील काही पाकिस्तानी चौक्या पाण्याखाली गेल्या. भारताला हवे तेव्हा दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण करु शकतो, असं म्हटलं जातंय.

सिंधू पाणी करारांतर्गत चिनाब नदीचे पाणी रोखण्यापूर्वी किंवा त्यावर बांधलेल्या धरणांमधून अचानक पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यात येते. आता हा करार स्थगित करण्यात आलाय. त्यामुळे आता त्याची माहिती दिली जात नाही आणि भारत जेव्हा इच्छितो तेव्हा पाकिस्तानमध्ये दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण करू शकतो, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

पाकिस्तानचा हल्ला भारताने हाणून पाडला 

7 मे 2025 ला रात्री, पाकिस्ताननं भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताकडून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले.पाकिस्तानकडून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्र S-400 च्या मदतीनं जमीनदोस्त करत भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचा कणा मोडला. S-400  ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम प्रामुख्यानं चीन आणि पाकिस्तानला केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आली असून, या प्रणालीची रेंज 40 ते 400 किमी इतकी सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच भारतासह रशियाचा S-400 संबंधित करार झाला. सध्याच्या घडीला ही वायू संरक्षण प्रणाली जगभरातील सर्वात शक्तिशाली संरक्षण क्षमता असणारी प्रणाली म्हणून अनेक शत्रू राष्ट्रांना धडकी भरवत आहे.

SOURCE : ZEE NEWS