Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, UGC
पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 32 जखमी आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) म्हटले आहे की आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात पथकाला यश मिळाले आहे आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे.

फोटो स्रोत, UGC
कुंडमळा हे या परिसरातील एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळं आठवड्याच्या अखेरीस याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. आज रविवार असल्यामुळं याठिकाणी गर्दी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत मदतकार्य वेगानं सुरू आहे, असं सांगितलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की सध्या बचावकार्य सुरू आहे. NDRF चे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“दुर्घटनेचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे,” असं फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, x.com
तर ही दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असून कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, UGC
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघातानंतर एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
“पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरिक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना,” असं सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दुर्घटनेला सरकार जबाबदार-अंधारे
शिवसेना ( UBT) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले, “इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती.
वारंवार ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केलेली असताना आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC