Source :- BBC INDIA NEWS

रविवारी महाराष्ट्रात कुठे आहे पावसाचा इशारा? जाणून घ्या, हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज
Published
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 19 ते 21 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यताही आहे.
19 सप्टेंबरला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नाशिक, बीड आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक घाट परिसर, धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
पावसासोबत काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटादरम्यान मोकळ्या जागेत जाणं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
20 सप्टेंबरलाही राज्यातील पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरींचा जोर राहू शकतो. यात रायगड, रत्नागिरी सिंधूदुर्गसह मराठवाड्यात बीड, संभाजनगर, परभणी आणि हिंगोलीत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
21 सप्टेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून, काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे होऊ शकतात. तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, आणि हिंगोलीत पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
देशाच्या वायव्य भागातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता असली, तरी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस स्थानिक पातळीवर पावसाचा जोर वाढू शकतो.
त्यामुळे 19, 20 आणि 21 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि काही मराठवाडा भागांमध्ये नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC




