Home LATEST NEWS ताजी बातमी चेंबूरच्या दुर्घटनेतला विहानचा मृत्यू टाळता आला असता? ‘झाड कोसळू शकतं’ सांगणाऱ्या 2...

चेंबूरच्या दुर्घटनेतला विहानचा मृत्यू टाळता आला असता? ‘झाड कोसळू शकतं’ सांगणाऱ्या 2 पत्रांकडे कुणी दुर्लक्ष केलं?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बस मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते.

सकाळी घरातून शाळेसाठी निघालेला 11 वर्षीय विहान श्रीवास्तव संध्याकाळी घरी परतणार होता. पण चेंबूरमध्ये त्याच्या शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळलं आणि त्या धक्क्यानं त्याचं कुटुंबच उन्मळून पडलं. सगळ्यांचा लाडका विहान आता परतणार नव्हता. आता मात्र त्याचा मृत्यू टाळता आला असता असं पूर्वी झालेल्या पत्रव्यवहारातून दिसून येतंय. विहानचा मृत्यू हा केवळ अपघात होता की निष्काळजीपणाची किंमत, हा प्रश्न आता अस्वस्थ करणारा ठरत आहे.

30 जून रोजी दुपारी मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images

30 जून रोजी दुपारी मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला.

आता या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने रस्ते विभागाला किमान दोन वेळा लेखी पत्रांद्वारे इशारे दिले होते, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अंतर्गत अधिकृत पत्रव्यवहारातून दिसून येतंय.

या पत्रांमध्ये झाडांच्या मुळांजवळ सुरू असलेलं खोदकाम आणि त्याच कामाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या खोदण्यामुळे झाडांची मुळे खराब होत असून, पावसाळ्यात झाडं कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.

मात्र, हे इशारे देऊनही आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य मुंबईकरांसह विरोधी पक्षातील नगरसेवक करत आहेत.

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने चौकशी समिती स्थापन केली असून,

प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रथमदर्शनी निष्काळजीपणा आढळल्याचे सांगत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये एम/पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता (रस्ते) अरुण मुंडे आणि सहायक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर यांचा समावेश आहे.

प्राथमिक व विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित करण्यात आले असून, या दुर्घटनेप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विहानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विहानची आई घटना घडून काही तास उलटले तरीही धक्क्यातून सावरलेली नाही.

नेमकं काय घडलं?

चेंबूर (पश्चिम) येथील हरिताज प्रीतम इमारत, रोड क्र. 11, डायमंड गार्डनजवळून ‘युनिव्हर्सल हायस्कूल’ची बस 30 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता जात असताना पिंपळाचं झाड मुळासकट उन्मळून बसवर कोसळलं.

या घटनेत बसमध्ये एकूण 13 मुले अडकली होती. त्यापैकी 12 मुलांची मुंबई अग्निशमन दल, बसवाहक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुटका करून त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विहानची आई घटना घडून काही तास उलटले तरीही धक्क्यातून सावरलेली नाही.

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बस मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते.

तर 11 वर्षीय विहान श्रीवास्तव गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

‘चांगला खेळणारा पोरगा आमच्यातून गेला’

या दुर्घटनेत मृत्यू झालेला विहान हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई रुग्णालयात काम करते, तर वडील एका पेट्रोलियम कंपनीत कार्यरत आहेत. 3 वर्षांपूर्वी हे कुटुंब दिल्लीहून मुंबईतील कुकरेजा सोसायटीत वास्तव्यासाठी आले होते.

विहानला क्रिकेटची विशेष आवड होती. त्यामुळे तो सोसायटीतील अनेकांना परिचित होता.

या घटनेबाबत बोलताना श्रीवास्तव कुटुंबाचे शेजारी आणि स्थानिक आमदार तुकाराम काते म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला आणि संपूर्ण कुकरेजा सोसायटी परिवाराला याचे दुःख आहे. चांगला खेळणारा पोरगा आमच्यातून गेला. मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. याप्रकरणी मी सभागृहातही सर्वांचे लक्ष वेधले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.”

विहानला क्रिकेटची विशेष आवड होती. त्यामुळे तो सोसायटीतील अनेकांना परिचित होता.

पुढे काते म्हणाले, “घटना घडून काही तास उलटले तरी विहानची वाट पाहत त्याची आई बसली आहे. तिच्या हातात त्याची शाळेची बॅग आणि क्रिकेटची बॅट आहे. आई-वडील कामावर जाताना मुलगा व्यवस्थित होता; पण घरी परतल्यानंतर तोच राहिला नाही.”

पालिकेच्या उद्यान विभागाने रस्ते विभागाला दिला होता इशारा

या प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत अधिकृत पत्रव्यवहारातून महत्त्वाची बाब समोर आली आहे.

पालिकेच्या उद्यान विभागाने रस्ते विभागाला किमान दोन वेळा लेखी इशारे देत सांगितले होते की, रस्ते आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांजवळ होणाऱ्या खोदकामामुळे झाडांची मुळे खराब होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात झाडे कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

27 जानेवारी 2026 रोजीचा पहिला इशारा 24 जानेवारी रोजी कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर देण्यात आला होता.

या पाहणीत चेंबूर (पूर्व) येथील रोड क्र. 11 आणि रोड क्र. 14 येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामादरम्यान ठेकेदारांनी झाडांच्या खोडालगत खोदकाम केल्यामुळे झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

चेंबूर दुर्घटना: आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या पत्रात स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, झाडांच्या मुळांजवळ करण्यात आलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात ही झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते.

उद्यान विभागाने रस्ते विभागाला तातडीने झाडांच्या मुळांजवळील उत्खनन थांबवण्याचे, झाडांच्या बुंध्याभोवती साचलेला बांधकामाचा मलबा हटवण्याचे आणि प्रत्येक झाडाभोवती किमान 1 मीटर × 1 मीटर आकाराचा खड्डा करून त्यात लाल माती भरण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून झाडांच्या मुळांची योग्य वाढ होईल.

पहिल्या इशाऱ्यानंतरही दुर्लक्ष

पहिल्या इशाऱ्यानंतरही रस्ते विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याने 4 महिन्यांनी पुन्हा पत्र देण्यात आल्याची माहिती बीबीसीला अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

उद्यान विभागाने रस्ते विभागाला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात नमूद करण्यात आले होते की, पूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही. रोड क्र. 11, रोड क्र. 21, सिंधी सोसायटी परिसर आणि कलेक्टर कॉलनी परिसरात पुन्हा पाहणी करण्यात आली. या पाहणीतही रस्त्यांच्या कामांमुळे झाडांच्या मुळांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले. या झाडांपैकी एखादे झाड कोसळल्यास संबंधित विभाग आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असतील, असा इशाराही या पत्रात देण्यात आला होता.

दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

पालिकेच्या अंतर्गत विभागांमध्ये पत्रव्यवहार होऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि नगरसेवक सचिन पडवळ यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

बीबीसी मराठीशी बोलताना सचिन पडवळ म्हणाले, “उद्यान विभागाने दिलेल्या लेखी इशाऱ्यांनंतर रस्ते विभागाने कोणती पावले उचलली? झाडांच्या मुळांजवळील उत्खनन थांबवण्याच्या सूचनांची अंमलबजावणी का झाली नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आवश्यक उपाययोजना वेळेत करण्यात आल्या असत्या, तर ही दुर्घटना टाळता आली असती का? याचीही चौकशी व्हायला हवी. तसेच, पुढे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करताना झाडांबाबत स्वतंत्र तपासणी व्हायला हवी.”

दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “मुंबईत फक्त 33 लाख झाडे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काँक्रीटचे रस्ते करताना उरलेली झाडेही धोक्यात येत आहेत. झाडे नष्ट होणे ही गंभीर बाब आहेच; पण अशा दुर्घटनांमध्ये लोकांचा मृत्यू होणे अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईतील झाडांचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते करताना विविध प्राधिकरणांच्या सूचनांचे पालन झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.”

अकस्मात मृत्यूची नोंद : पुढील तपास सुरू

या घटनेबाबत मुंबई पोलीस उपायुक्त समीर शेख म्हणाले की, “दि. 30.06.2026 रोजी सुमारे 2.30 वाजता चेंबूर येथील रोड क्र. 11 वर युनिव्हर्सल शाळेच्या बसवर झाड कोसळून अपघात झाला.

या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.”

संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन आणि कंत्राटदारावर कारवाई

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेच्या चौकशीसाठी दोन उपआयुक्तांची समिती नेमली असून, तिला 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रथमदर्शनी निष्काळजीपणा आढळल्याचे सांगत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये एम/पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता (रस्ते) अरुण मुंडे आणि सहायक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर यांचा समावेश आहे. प्राथमिक व विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित करण्यात आले असून, या दुर्घटनेप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेच्या चौकशीसाठी दोन उपआयुक्तांची समिती नेमली आहे

तसेच, या चौकशीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक शिफारशी करण्यासही सांगण्यात आले आहे.

पालिकेने यासोबतच या वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त झाली नव्हती, तसेच 12 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आणि पावसाळ्यापूर्वी 29 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या छाटणीदरम्यान झाड सुरक्षित अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला आहे. मात्र, पुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे नव्याने पुनर्परीक्षण, कालबद्ध तपासणी आणि आवश्यक छाटणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC