Source :- ZEE NEWS

Water strike On Pakistan: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तानची पाणीकोंडी होणार आहे.आता भारतानं एक पाऊल पुढे टाकत चिनाब नदीवरील कालव्याची लांबी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला. भारत सरकार आता चिनाब नदीवरील रणबीर कालव्याची लांबी वाढवण्याच्या योजनांवर विचार करत आहे.रणबीर कालव्याची लांबी 120 किमीपर्यंत वाढवणार आहे. भारत चिनाबचं पाणी मुख्यतः सिंचनासाठी वापरत होता.परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय. पूर्वी पाकिस्तान वापरत असलेल्या नद्यांवर सुमारे 3000 मेगावॅटची सध्याची जलविद्युत क्षमता वाढवण्याची योजना आखत असल्याचंही समोर आलंय.

नेमकी योजना काय?

रणबीर कालव्याची लांबी 120 किमी पर्यंत वाढवणे ही एक प्रमुख योजना आहे. पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी वेळ लागत असल्याने, सर्व भागधारकांना ही प्रक्रिया जलद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, कठुआ, रावी आणि परागवाल कालव्यांमधून गाळ काढण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

येत्या काळात पाकची पाणीकोंडी

सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारतानं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं.मात्र ह्याला फार उशिर लागणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.त्यातच आता भारतानं चिनाब नदीवरील कालव्याची लांबी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय.त्यामुळे येत्या काळात पाकची पाणीकोंडी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील राहणार, हे मात्र खरंय.

भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी

भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी भरलीय. भारत खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशात पाठवणार आहे. आता बावचळलेला पाकिस्तान भारताची कॉपी करतोय. पाकिस्तानही आता भारतासारखं शिष्टमंडळ पाठवणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीत पाकिस्तान भारताची कॉपी करत असल्याचं पाहायला मिळतंय. दहशतवादाविरोधात आपली भूमिका आणि पाकिस्तानच्या नापाक कारवाया जगासमोर ठेवण्यासाठी भारताने आपलं शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला. आता हे ऐकल्यावर गप्प बसेल तो पाकिस्तान कसला?मग आता पाकिस्तानने भारताची कॉपी करत पाकिस्तानी शिष्टमंडळही जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात झालेल्या बदनामीनंतर पाकिस्तानने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केलाय. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.

पाकिस्तानात महागाईचा भडका 

भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देणा-या पाकिस्तानात महागाईचा भडका उडालाय.भारतानं पाकिस्तानसोबत व्यापारबंदीचा निर्णय घेतलाय. भारतानं आयात – निर्यात पूर्णपणे बंद केलीय.डोळे वाटारलेल्या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलंय. भारताकडून पाकिस्तानची व्यापारी कोंडी केली जाते आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तानसोबत व्यापारावर बंदी घातली आहे.त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय.पाकिस्तानात अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्यात.भारताशी युद्धाची भाषा करून पाकिस्ताननं स्वतच्या पायावर कु-हाड मारून घेतली आहे.भारताकडून होणारा पुरवठा बंद झालाय. त्यामुळे पाकिस्तानात अन्नधान्य महागल्यानं अनेक नागरिकांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचे थेट परिणाम हाताबाहेर गेलेली महागाई आणि वाढत्या जनक्षोभातून दिसू लागलेत.सामान्य जनतेमधील ही अस्वस्थता बंडाच्या रूपानं कधीही बाहेर पडण्याचा धोका आहे.

SOURCE : ZEE NEWS