Source :- BBC INDIA NEWS

एकेकाळी गवत समजून मुगाची रोपं उपटली; आज 20 हजार शेतकऱ्यांना देतात शेतीचे धडे
Published
सासूबाईंसोबत पहिल्यांदा शेतात कामाला गेल्या तेव्हा गवत उपटण्याऐवजी त्यांनी मुगाची रोपंच उपटली. कारण त्यांनी यापूर्वी कधीच शेती केली नव्हती. पुढे शेताची वाटणी झाली आणि त्यांच्या पतीच्या वाट्याला दीड एकर जमीन आली. पण पतीला दारूचं व्यसन असल्यामुळे शेतीची संपूर्ण जबाबदारी वैशालीताईंवर आली. शेतातील भाजीपाला बाजारात विकण्यासाठी जात असताना त्यांचा बचत गटातील महिलांशी संपर्क आला. याच टप्प्यापासून त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं, असं वैशालीताई सांगतात.
बचत गटाकडून त्यांना पाच हजार रुपयांचं कर्ज मिळालं. तेवढ्या पैशात त्यांनी पहिल्यांदा घराची डागडुजी केली. पुढे त्यांनी कृषी विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलं आणि घरीच गांडूळ खताची निर्मिती सुरू केली. आज दीड एकर शेतीच्या जोरावर त्यांनी 13 म्हशी आणि दोन गाई पाळल्या आहेत. त्यासोबत कुक्कूटपालनही करतात. वर्षाला त्या जवळपास 40 टन गांडूळ खताची विक्री करतात.
भाजी विकण्यापासून सुरुवात केलेल्या वैशाली घुगे आज लाखो रुपयांचा शेतीपूरक व्यवसाय उभा करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांना प्रशिक्षक म्हणून निमंत्रित केलं जातंय. आजवर आपण 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचं ते सांगतात. त्यांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा युवा प्रगतशील शेतकरी गौरव पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली आणि मुंबईतील कृषीविषयक कार्यक्रमांमध्येही त्यांना वक्त्या म्हणून निमंत्रित केलं जातं. याशिवाय 2024 मध्ये इटलीतील शेती पद्धतींचा अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली होती.
दरम्यान, त्यांच्या नावावर शेती नसल्यामुळे सरकारी नोंदींमध्ये त्यांची शेतकरी म्हणून आजवर नोंद नव्हती. त्यामुळे त्यांनी शेती उत्पादक कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तत्कालीन जिल्हाधिकारी प्रशांत ननावरे यांनी हस्तक्षेप करून त्यांना फॅमिली फार्म होल्डिंग सर्टिफिकेट मिळवून दिलं आणि कंपनी स्थापन करण्यासाठी मदत केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




