Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा जोर बराच ओसरला आहे, पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
दरम्यान, एल निनो आणखी तीव्र होत असल्यांचं जागतिक हवामान संस्थेनं म्हटलंय.
त्याचा भारताच्या मान्सूनवर कसा परिणाम होतोय? आणि पुढचे काही दिवस राज्यात हवामान कसं असेल? हे जाणून घेऊया.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं आहे.
पुढच्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, तर पूर्व विदर्भाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातल्या 9 भागांना यलो अलर्ट जारी केला आहे.
कोणत्या भागांना यलो अलर्ट?
दरम्यान पॅसिफिक महासागरात सक्रीय असलेल्या एल निनो परिस्थितीची तीव्रता पुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज जगभरातील हवामान संस्थांनी मांडला आहे.
एल निनो म्हणजे अशी स्थिती जेव्हा पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडच्या भागात समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान नेहमीपेक्षा जास्त असतं.
यंदा या भागात पाण्याचं तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढू शकतं, असा अंदाज नोआ (NOAA) या अमेरिकेतील संस्थेनं वर्तवला आहे.
याचा परिणाम म्हणून 2027 मध्ये प्रचंड उष्णता जाणवू शकते, असं हवामान तज्ज्ञ सांगतात.
फोटो स्रोत, mausam.imd.gov.in
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं आहे.
पुढच्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि वाशीम या पूर्व विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे हवामान विभागाने या नऊ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
फोटो स्रोत, @Indiametdept
सध्या राज्यात स्थिती कशी आहे?
देशात 4 जूनला मान्सूनचं आगमन झालं असलं, तरी 21 ऑगस्टपर्यंत देशभरातील पावसात 13.2 टक्के, तर एकट्या ऑगस्ट महिन्यातील पावसात 15.2 टक्के तूट नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात आतापर्यंत पावसाची तूट 6 टक्के आहे. विदर्भात 23% कमी पाऊस झाला, मराठवाड्यात 22% तूट आहे तर कोकणात सरासरीपेक्षा 5% कमी पाऊस झालाय.
मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा 16% जास्त पाऊस झालाय विशेषतः घाट परिसरात सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त आहे.
फोटो स्रोत, @Indiametdept
विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची ही घटती आकडेवारी आगामी काळात शेती आणि पाणीसाठ्यासाठी मोठं आव्हान ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.
पावसातील या तुटीचा परिणाम राज्यातील धरणसाठ्यावरही दिसू लागला आहे.
विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मध्यम व लहान धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक नसल्याने खरीप पिकांसाठी पुढील काही आठवडे महत्त्वाचे मानले जात आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला तर काही प्रमाणात ही तूट भरून निघू शकते.
मात्र पाऊस कमी राहिला, तर शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्याही नियोजनासमोर आव्हान निर्माण होऊ शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




